सोलापूर : इयत्ता बारावीची परीक्षा आता अंतिम टप्प्यात असून परीक्षेचा निकाल जाहीर होताच ‘डीएड’ प्रवेशाला सुरवात होणार आहे. यंदाही पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के तर अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुणाची अट आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आगामी काळात इयत्ता दहावी व बारावीच्या वर्षातून दोनदा परीक्षा होणार असून सेमिस्टर पॅटर्न लागू करण्याचेही विचाराधिन आहे. जेणेकरुन अभ्यासाचा ताण विद्यार्थ्यांवर रहाणार नाही हा त्यामागील हेतू आहे. दरम्यान, अंगणवाडी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत हे धोरण लागू होणार असून सध्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ते लागू करण्यात आले आहे. १५ जूनपासून अंगणवाडी ते पहिली व दुसरीचा अभासक्रमही बदलणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित वर्गांसाठीही हे धोरण लागू होणार आहे.
त्यात ‘डीएड’चा देखील समावेश आहे. पण, ते लागू व्हायला अजून किमान दोन वर्षे तरी लागणार आहेत. तुर्तास, जुन्याच पद्धतीने ‘डीएड‘चे प्रवेश होणार असून त्याअनुषंगाने सध्या ज्या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचे ठरविले आहे, त्यांची पडताळणी दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) प्राचार्यांमार्फत केली जात आहे.
यंदाही प्रवेश पूर्वीच्याच प्रमाणे होतील
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘डीएड’चा अभ्यासक्रम व आराखडा बदलणार आहे, पण सध्या त्यासंदर्भातील सूचना, संकल्पना, अभ्यासक्रम कसा असावा यासंदर्भातील मते केंद्र सरकारने मागविली आहेत. तुर्तास, पूर्वीप्रमाणेच ‘डीएड’चे प्रवेश होतील. इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रवेशाला सुरवात होईल.
- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर
३८ हजारांवरील प्रवेश आता अकराशेवर
२००६ ते २०१० पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ‘डीएड’ महाविद्यालयांची संख्या ८५ होती आणि प्रत्येकाच्या सरासरी दोन ते तीन तुकड्या होत्या. त्यावेळी दरवर्षी ३५ ते ३८ हजार विद्यार्थी शिक्षण होण्यासाठी ‘डीएड’ला प्रवेश घ्याचे आणि खासगी अध्यापक महाविद्यालयांची फी देखील दोन ते तीन लाखांपर्यंत होती. मात्र, सध्या जिल्ह्यात २८ ‘डीएड’ महाविद्यालये असून २०१२ नंतर या महाविद्यालयांना घरघर लागली. शिक्षक भरती नसल्याने याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आणि सध्या दरवर्षी दीड हजारापेक्षाही कमी प्रवेश होऊ लागले. गतवर्षी जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांमध्ये केवळ ११०० विद्यार्थ्यांनी ‘डीएड’साठी प्रवेश घेतला आहे.
जिल्ह्यातील ‘डीएड’ची स्थिती
दहा वर्षांपूर्वी एकूण महाविद्यालये
८५
त्यावेळची प्रवेश क्षमता
३८,०००
सध्या चालू महाविद्यालये
२८
अंदाजे प्रवेश क्षमता
१,६००
गतवर्षी झालेले प्रवेश
१,१००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.