मुंबई : नबाब मलिक (Nawab malik) मुस्लीम आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते, असे सांगणाऱ्या संजय राऊत (sanjay Raut) यांनी दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांचे भाषण (cm uddhav Thackeray) आठवावे. ज्या रंगाची गोळी आपल्या शरीराला स्पर्शून जाईल तो रंग हिंदुस्थानातून.... या आपल्या वडिलांच्या जगप्रसिद्ध वाक्याचा त्यांनी पुनरुच्चार केला होता, अशी आठवण भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊत यांना करून दिली आहे.
तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म, असा प्रश्नही भातखळकर यांनी राऊत यांना विचारला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या अनेक दसरा मेळाव्यात किंवा मोठ्या सभांमध्ये अगदी सर्वोच्च नेत्यांकडून हे वाक्य अनेकदा वापरले गेले आहे. या वाक्यातील त्या गोळीचा रंग नेमका कोणता होता व त्यातून काय अर्थ अभिप्रेत होतो, ते वाक्य पुन्हा ऐकवून मुख्यमंत्र्यांना नेमके काय सांगायचे होते, याचे ज्ञान सर्वज्ञानी जगप्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे. त्यातून सर्वांच्याच ज्ञानात अमूल्य भर पडेल, अशा शब्दांत भातखळकर यांनी राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
अमली पदार्थप्रकरणी एनसीबी ने मलिक यांच्या जावयाला अटक केल्यामुळे मलिक आणि वानखेडे यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. एनसीबी वर आगपाखड करणाऱ्या मलिक यांच्यावर चहूबाजूंनी टिकेची झोड उठत असल्याने शिवसेना नेतेही त्यांच्या साह्याला येत आहेत. यानिमित्ताने शिवसेना नेते केंद्रातील भाजप सरकारवरही टीका करीत आहेत. मलिक हे मुस्लीम आहेत म्हणून त्यांच्यावर टीका होत असल्याचे विधान राऊत यांनी नुकतेच नाशिक येथे केले होते. त्याला भातखळकर यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण या म्हणीचे चपखल उदाहरण म्हणून राऊत यांचे हे वाक्य दाखवता येईल, असा टोमणाही त्यांनी मारला आहे.
शिवसेना आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडीला लावून बसल्याने मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांच्यावर कोणीही टीका करू नये, असेच राऊत सूचित करत आहेत. मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचे अगदी खालपासून ते वरपर्यंतचे लहानमोठे नेतेही हिरवे, पाकडे अशी विशेषणे वापरीत होते. राऊत स्वतः कार्यकारी संपादक असलेल्या वर्तमानपत्रातून देखील अशाच भाषेची हिरेमाणके उधळली जात होती. तेव्हा या विशिष्ट धर्मियांवर होणाऱ्या टिकेबद्दल राऊत यांना काहीही आक्षेप वाटत नसे. मात्र आताच गेल्या दोन वर्षांपासून त्यांना अचानक मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांच्यावर टीका होत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे राऊत यांनी आपली स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बंगाली फकीर बाबा कडून काही दवाई घ्यावी हेच उत्तम. आता ती दवाई त्यांना फारच गोड लागेल, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.