उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर त्यांनी केलेले पहिले महत्वाचे राजकीय विधान होते, शिवशक्ती आणि भीमशक्तीने एकत्र यावे. आज कित्येक वर्षांनी ते विधान प्रत्यक्षात आले आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर त्यांनी केलेले पहिले महत्वाचे राजकीय विधान होते, शिवशक्ती आणि भीमशक्तीने एकत्र यावे.आज कित्येक वर्षांनी ते विधान प्रत्यक्षात आले आहे. शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळे झाले आहेत, मूळ पक्ष आमचाच असा या मंडळींचा दावा आहे. मातोश्री एका मोठया संकटातून जात असताना आज झालेल्या नव्या युतीमुळे नेमके फायदे काय होतील अन तोटे कोणते असतील याचा हा धांडोळा -
ठाकरे गटासाठी जमेच्या बाजू
१. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. हिंदुत्वावर विश्वास ठेवणारी काही मते सेनेपासून भाजपकडे गेली तर जे नुकसान होईल ते भरून काढण्यासाठी उध्दव ठाकरे यांना दलित आणि मुस्लिम मतांची बेगमी करायची आहे.दलित समाजात स्थान असणार्या नेत्याचा आधार त्यांना हवा आहे. मुंबईतील दलित समाजात मान असलेले रामदास आठवले आज भाजपसमवेत आहेत. प्रकाश आंबेडकरांमुळे दलित मते मिळाली तर ती जमेची बाजू ठरेल.
२. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे परस्परांशी संवाद तर सतत केला. एकत्र पत्रपरिषदा घेतल्या. पण जागावाटपात मात्र ही एकी दिसली नाही. सेनेला अशा वेळी नव्या मित्राची रसद मते मिळवून देवू शकेल.
३. महाराष्ट्रातल्या किमान ५० ते ६० मतदारसंघात आंबेडकरांच्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे त्यांना काही हजार मते मिळतात.शिवसेनेच्या ठाकरे गटाला या मतांचा लाभ होईल.
ठाकरे गटासाठी चिंतेची कारणे
१. मराठवाडा हा ठाकरेगटाला साथ देणारा भाग.तेथे जातीय राजकारण अत्यंत वाईट पद्धतीने प्रत्यक्षात येते.सवर्ण आणि दलितांच्या संघर्षात नव्या युतीबद्दल काय विचार होईल? सवर्ण दूर जाणार नाहीत ना?
२. महाविकास आघाडीत नवे मित्र जोडले गेल्यावर त्या त्या पक्षाने आपल्या कोटयातील जागा त्यांना द्याव्यात असे ठरले आहे. शिवसेनेला आता वंचित बहुजन विकास आघाडीला जागा द्याव्या लागतील. या त्यागामुळे कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळणार नाही.
३. उध्दव ठाकरे यांनी आंबेडकरांच्या समावेशाबद्दल कमालीची आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस काहीशी दुखावण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकरांना मात्र या नव्या मैत्रीचा लाभ होण्याची शक्यता बरीच आहे. एमआयएम दूर गेल्यानंतर त्यांना तसा साथीदार नव्हता. अकोला बुलढाणा या भागात शिवसेनेच्या विचारावर निष्ठा असलेले मतदार त्यांना मतदान करू शकतात.ते आडून मैत्री करतात अशी सतत चर्चा होई.वळचणीला राहून राजकारण करण्याची त्यांची अपरिहार्यता या खुल्या मैत्रीमुळे संपली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.