नागपूर : राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच विभागात पावसामुळे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आल्यानंतर सर्वच पक्ष मदतीची मागणी करतात. मात्र, फक्त राज्याने मदत करण्यापेक्षा केंद्र आणि राज्याने मदत केली, तर अधिक सोयीस्कर ठरेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) म्हणाले. आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर आता मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जवळपास १७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. पण, पंचनामे अजून झाले नाही. मराठवाड्यातील १० जिल्ह्यांपैकी ७ जिल्ह्यांत ७५ ते ८० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत. पण, पंचनामे झाल्याशिवाय पूर्ण मदत घोषित करणे शक्य नाही. त्यासाठी आधी पंचनामे करावे लागतील. जिल्हानिहाय सर्व माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार एकूण किती लाख हेक्टरचं नुकसान झालं हे समजल्यावर भरघोस मदत देत येईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
कर्ज काढा, पण शेतकऱ्यांचे जीव वाचवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठवाडा ओल्या दुष्काळाने होरपळला आहे. १० पैकी ७ जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. उडीद, मूग, सोयाबीन सर्वच पिकांचं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती नाकारता येत नाही. पण, आता सरकारला कर्ज काढायची गरज आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट ठरवले. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.