नागपूर : ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्याची भरपूर क्षमता असून, अधिकाधिक वाहने इलेक्ट्रिकवर चालू लागली तर वीज हे आता भविष्यातील इंधन होऊ शकते. त्या दिशेने आमचे काम सुरू आहे. इलेक्ट्रिक मोटारसायकल, स्कूटर, बस ही वाहने प्रदूषणरहित असल्याने देशासाठी अत्यंत फायदेशीर राहणार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
इलेक्ट्रिक वाहनांची कोरोना नंतरची स्थिती काय असेल, या विषयावर ते उत्पादकांशी ई-संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले- आता इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजीचा इंधन म्हणून उपयोग करण्यास आपण यशस्वी झालो आहे.
इथेनॉल वापरून हेलिकॉप्टर चालविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. इथेनॉलवर दुचाकीही यशस्वी चालविल्याचा प्रयोग झाला आहे. या उद्योगात अद्ययावत तंत्रज्ञान हे आव्हान असू शकते. कारण दररोज नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रात पुढे येत आहे. ऑटोबाईल उद्योगातील वाहने उत्पादनांची किंमत कमी झाली तर हा उद्योग अधिक सक्षम होईल.
इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने 12 टक्के जीएसटी लागू केला आहे. पण, वाहन उत्पादक कंपन्यांची अधिक सवलती मिळाव्या अशी अपेक्षा आहे. वास्तविक 12 टक्के जीएसटी हीच मोठी सवलत आहे. पण, शासनाकडून अधिक सवलती मिळणे, सध्याची आर्थिक स्थिती पाहता कठीण वाटते. नुकतीच बजाज आणि टीव्हीएस या कंपन्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी वाहने निर्माण केली आहेत. चांगल्या दर्जाची ही वाहने आहेत.
तसेच महापलिकांनीही इलेक्ट्रिक बस विकत घेतल्या आहेत. हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे आपल्याला जावे लागणार आहे. मुंबईत डिझेलच्या बसला 150 रुपये प्रतिकिमी इंधनाचा खर्च येतो, तर इलेक्ट्रिक बससाठी तो 50 रुपये प्रतिकिमी येतो. इंधनाच्या आयातीवर होणारा 7 लाख कोटींचा खर्च लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहने देशासाठी आयात कमी करणारी व फायदेशीर ठरतील असेही गडकरी म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.