तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस ई-केवायसी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर आहे, त्यांचा लाभ बंद होणार आहे. लाभार्थींना ई-केवायसी करून घेण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींना मंगळवारी (ता. ४) ऑक्टोबरचा लाभ जमा झाला आहे. ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थीही निश्चित झाले आहेत. त्यामुळे लाभासाठी आचारसंहिता लागू असणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात सुरवातीला लाडकी बहीण योजनेत ११ लाख नऊ हजार ४७८ महिला लाभार्थी होत्या. त्यानंतर योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर जिल्ह्यात चारचाकी वाहने असलेल्या साडेसोळा हजार महिला होत्या. याशिवाय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला आणि २१ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त वयाच्या ९९ हजार ८०० लाभार्थी निघाल्या. शासकीय सेवेत असतानाही लाभ घेणाऱ्या महिला १७० होत्या. तर केंद्र व राज्य शासनाच्या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचीही संख्या २२ हजारांवर होत्या. यातील अनेकांचा लाभ बंद झाला आहे.
दुसरीकडे शेतकरी सन्मान निधी योजनेतील शेतकरी महिलांचीही संख्या आठ हजारांवर होती. त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी सहा हजारांप्रमाणे १२ हजार रुपये मिळतात. त्यामुळे त्या महिला शेतकऱ्यांना (लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला) दरमहा १५०० ऐवजी पाचशे रुपयेच दिले जातात. आता ‘ई-केवायसी’तून उत्पन्नाच्या निकषांनुसार अपात्र लाभार्थी शोधून त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थींची स्थिती
सुरवातीचे लाभार्थी
११,०९,४७८
दरमहा लागणारा निधी
१६६,४२,१७,०००
पडताळणी झालेले लाभार्थी
१,३८,४७०
अंदाजे शेतकरी महिला
८,०००
सध्या मिळणारा निधी
१४४,८५,१२,०००
‘ई-केवायसी’तून समजणार वार्षिक उत्पन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे निकष ठरवले आहेत, त्या प्रत्येक निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू आहे. पडताळणीचा शेवटचा टप्पा आता ‘ई-केवायसी’चा आहे. यात प्रत्येक लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके समजणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ लगेचच बंद होणार आहे. राज्यभरातील अडीच लाख लाभार्थींपैकी आतापर्यंत केवळ ९२ लाख महिलांनीच ई-केवायसी केली आहे. उर्वरित महिलांना आता १३ दिवसांत ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे.
मुदतीत करून घ्यावी ई-केवायसी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करण्यासाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. मुदतवाढीचा निर्णय शासन स्तरावर होईल. पण, योजनेचा लाभ पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी मुदतीत ई-केवायसी करून घ्यावी.
- दीपक ढेपे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.