देशाने रावतांसारखा माणूस आणि लष्कराशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींना गमावले असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली - सरसेनाध्यक्ष बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघातानंतर माजी संरक्षणमंत्री शरद पवार (sharad Pawar) यांनी आज ‘सकाळ’शी संवाद साधताना हेलिकॉप्टर प्रवासादरम्यानचा असाच एक थरारक प्रसंग सांगितला. एवढे सुरक्षित हेलिकॉप्टर अशा पद्धतीने कोसळणे धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. तामिळनाडुत (Tamil Nadu) झालेल्या अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. यामुळे देशावर शोककळा पसरली आहे.
बिपिन रावत यांचा अपघात झाला, तो परिसर हा संपूर्ण जंगलाचा आणि डोंगरांचा आहे. तिथे दृश्यमानतेच्या समस्येमुळे हा अपघात झाला असावा. पण या अपघातामुळे देशाने रावतांसारखा माणूस आणि लष्कराशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींना गमावले असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान शरद पवार यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. पवार म्हणाले की, ‘‘ माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. मी पुण्याहून मुंबईला निघालो होतो. माझ्याबरोबर माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री होते. लोणावळा, खंडाळा संपवून पुढे आल्यावर एक व्हॅली आहे. तिथे खूप ढग असतात. तिथे आमचे हेलिकॉप्टर ढगात सापडले. खूप जोराचा वारा आल्यामुळे हेलिकॉप्टर पुढे जाण्याला मर्यादा आल्या. आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. आम्ही उंचीची काळजी घेतली नसती तर हेलिकॉप्टर व्हॅलीत आदळलेही असते. पण मला महाराष्ट्राची माहिती होती.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच जे ठिकाण आहे, ते कळसूबाई आहे. ते काही पाच हजार फुटांच्या पुढे नाही म्हणून व्हॅलीत हेलिकॉप्टर सापडले असताना मी तातडीने पायलटला ते सात हजार फूट उंचीवर घेण्यास सांगितले. तिथे गेल्यावर हेलिकॉप्टर धडकणार नाही, याची खात्री होती. पायलटने ती उंची गाठली आणि काही दिसत नसताना त्या ढगांतून हे संकट आम्ही पार करू शकलो असेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.