मुंबई - अर्थसंकल्प सादर होताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या 19 आमदारांपैकी सरकारने आज पहिल्या टप्प्यात केवळ 9 आमदारांचे निलंबन मागे घेतले. आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी सतत होत असताना फार दिवस त्यांना सभागृहाच्या बाहेर ठेवणे उचित नसल्याचे सांगत संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेत निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला. निलंबन मागे घेण्यात आलेल्या आमदारांमधे कॉंग्रेसचे संग्राम थोपटे, अमित झनक, अब्दुल सत्तार व डी. पी. सावंत यांचा, तर राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण, दत्तात्रय भरणे, अवधूत तटकरे, वैभव पिचड व नरहरी झिरवाळ या पाच जणांचा समावेश आहे. उर्वरित 10 आमदारांच्या निलंबन माघारी बाबत सरकार तुर्तास तयार नसल्याचे आज स्पष्ट झाले. मात्र, केवळ नऊ जणांचे निलंबन मागे घेत सरकारने विरोधकांवरील दबाव कायम ठेवल्याचे मानले जात आहे. कॉंग्रेसचे अमर काळे, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ, कुणाल पाटील, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, संग्राम जगताप, राहुल जगताप यांचे निलंबन कायम आहे. |