तात्या लांडगे
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील ५३ वयापर्यंतच्या सर्व शिक्षकांना दोन वर्षांत ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील १७ हजार शिक्षक पहिली ते आठवीच्या वर्गांवर शिक्षक आहेत. त्यातील टीईटी नसलेले शिक्षक आता परीक्षा देत आहेत. त्यातील हजारो शिक्षकांनी केंद्र सरकारच्या ‘सीटीईटी’साठी अर्ज केले आहेत. आता त्यांची परीक्षा आणि जिल्हा परिषदेचे मतदान एकाच तारखेला आल्याने शिक्षकांना परीक्षा देता येणार नाही.
राज्यातील सोलापूरसह १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान व ७ फेब्रुवारीला मतमोजणी, असे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारात निवडणुकीचा कार्यक्रम दोन दिवस पुढे ढकलला आहे. त्यानुसार आता ७ फेब्रुवारीला मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
या बदललेल्या वेळापत्रकामुळे १२ जिल्ह्यांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसह (ज्यांनी ‘सीटीईटी’साठी अर्ज केलेले) हजारो विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक उमेदवारांचे परीक्षा केंद्र परजिल्ह्यात आहे. त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी त्याठिकाणी वेळेत पोचावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांसह काही शिक्षक संघटनांनी निवडणूक ड्यूटीतून सूट देण्याची मागणी केली आहे.
शिक्षकांनी ‘सीटीईटी’साठी देखील केले अर्ज
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षकांना दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेसह महापालिका, नगरपालिका व खासगी प्राथमिक शाळांमध्ये किती शिक्षक ‘टीईटी’ उत्तीर्ण आहेत व किती नाहीत, याची माहिती मागविली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २३ नोव्हेंबरला घेतलेल्या ‘टीईटी’त काही शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. काही शिक्षकांनी केंद्राच्या ‘सीटीईटी’साठीही अर्ज केले आहेत.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
जूनमध्ये राज्याच्या ‘टीईटी’चे नियोजन
दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून शिक्षकांसाठी ‘सीटीईटी’ घेतली जाते. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून देखील ‘टीईटी’ घेतली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना मुदतीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होता यावे, यासाठी परीक्षा परिषदेकडून वर्षात दोनदा टीईटी घेतली जाणार आहे. त्यानुसार आता जूनअखेर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.