मुंबईः महाविकास आघाडीच्या वतीने १७ तारखेला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल बैठकीचं आयोजन केलं होतं. परंतु या बैठकीच काहीही घडलेलं नाही. केवळ आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 'हो ला हो' म्हणून आले.
''कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हॅक झालं असेल तर ते काल बैठक संपल्यावरच का सांगितलं. खुलासा करायला इतके दिवस का लागले. यासंदर्भात कारवाई का केली नाही? जेव्हा गाड्या फोडल्या जात होत्या, लोकांना ताब्यात घेतलं जात होतं ते तर प्रत्यक्षात होतं. ट्विटरवर नव्हतं. तेव्हा काही सुचलं नाही का?'' असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.
ठाकरे पुढे म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सीमावादाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात असल्याचं सांगितलं जातं. परंतु हा प्रश्न कोर्टात असतांना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला गेलाच की. मुळात कर्नाटककडून हा मुद्दा उपसून वाद पेटवला जात आहे. तुमचं सगळं सुरु आणि महाराष्ट्राने हाल सोसायचे, हे चालणार नाही. असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.