Valentines Day
Valentines Day  esakal
महाराष्ट्र

Valentines Day 2023 : यशवंतराव-वेणूताईंचा संसार म्हणजे ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’!

सकाळ डिजिटल टीम

राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर असलेल्या एका नेत्याच्या पत्नीची तक्रार असते की, तिचा नवरा तिला वेळ देत नाही. कारण, राजकारणात असलेले नेत्यांना समाजकारण इतके प्रिय असते की त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही.

या क्षेत्रात प्रतिष्ठा, पैसा, श्रीमंती मिळते पण वेळ मिळत नाही. तरीही साताऱ्यातील फलटणमधील एका तरूणीला देशभक्तीसाठी वेड्या झालेल्या तरुणाशीच लग्न करायचे होते. आणि तिने तस केलं ही. त्या तरूणीचे नाव होते वेणूताई चव्हाण. आणि त्यांनी ज्यांच्याशी लग्न केले त्या देशभक्ताचे नाव आहे यशवंतराव चव्हाण.

सातारा जिल्ह्यातील फलटणचे मोरे घराणे हे वेणूताई चव्हाण यांचे माहेर. त्यांच्यावर लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार झाले होते. त्यांना देशभक्ती, स्वातंत्र्य चळवळ या गोष्टीचा आदर होता. त्यामुळेच लग्नासाठी त्यांनी हा अनोखा पण ठेवला होता.

त्या दोघांचा विवाह २ जून १९४२ रोजी झाला. चव्हाण कुटुंबाच्या घराच्या उंबरठय़ावर ठेवलेले माप ओलांडून वेणूताईंनी पत्नी म्हणून प्रवेश केला, त्याच वर्षी ऑगस्ट क्रांती चळवळ उभी राहिली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात यशवंतरावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना अनेक दिवस तुरुंगात रहावे लागले. 

राजकारण हे यशवंतरावांच्या रक्तात भिनले होते. राजकारणात चढ उतार होत असतात. हे यशवंतरावांच्या बाबतीतही घडले. त्यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी वेणूताई या खंबीरपणे उभे राहायाच्या. यशवंतरांवाना इंदिरा गांधी यांनी अचानक रित्या अर्थमंत्री करण्याचा निर्णय सांगितला. त्यावेळी ते थोडे चलबिचल झाले. परंतु वेणूताईंनी त्यांना सावरले. त्यांनी वेणूताईंशी चर्चा करुन मार्ग काढला. 

परिणामी कुटुंबास हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यातच वेणूताईंचे दोन मोठे दीर गेले. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाची यशवंतराव-वेणूताईंच्या खांद्यावर पडली. ऐन तारुण्यात तुटपुंज्या उत्पन्नात मोठया कुटुंबाचा संसार वेणूताईंनी हालअपेष्टांची पर्वा न करता सुखाने व आनंदाने करण्यास प्रारंभ केला. तिकडे (मुंबईत) यशवंतरावांना काळजी पडत असे वेणूताई हे सर्व कसे सांभाळत असतील. या काळजीतून ते वेणूताईंना पत्र लिहित असतं. या पत्रात सूचनांबरोबरच आपलं कोण परकं कोण याची जाणिव ते त्यांना करुन देत. आपल्याकडे पैसे नाहीत म्हटल्यावर कोणाकडून उधार घ्यायचं, असे ते वेणूताईंना सांगत. कोणतीही तक्रार न करता वेणूताईंनी यशवंतरावांना संसारात साथ दिली. दिल्लीत गेल्यानंतर वेणूताईचे जीवन केवळ यशवंतराव आणि तेथील शिपायांच्या बायका एवढंच होतं. 

यशवंतराव हे दिल्लीत महाराष्ट्राचे वैभवस्थान होते, तर वेणूताई महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक. त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी घसरला नाही. मंत्र्याची पत्नी कशी असावी, तिचा पेहेराव व वागणूक कशी असावी, याच्या त्या आदर्श होत्या. वेणूताईंचे आदरातिथ्य पाहुण्यांना, नातेवाईकांना आश्चर्यचकित करीत असे. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची सुख-दु:खे त्या आपलीच समजत. महाराष्ट्रातील सर्व सण त्या उत्साहाने साजरे करीत. नरक चतुर्थीला बंगल्यातील सर्वाच्या घरी अगदी साडेसात-आठलाच फराळाचे ताट येत असे. वेणूताईंना मंगळसूत्राखेरीज इतर दागिन्यांची हौस नव्हती.

साहेबांना हवी असलेली पुस्तकं आणणं, सकाळीच त्यांचे कपडे, ऑफिसची बॅग तयार करून ठेवणं, देशातील वा परदेशातील प्रवासाला ते जायचे असल्यास त्यांच्या बॅगा तयार करणं, त्यात आठवणीनं त्यांची औषध ठेवणं, ही सर्व कामं वेणूताईच करीत, असे लेखन राम खांडेकर यांनी लिहीले आहे. राम खांडेकर हे यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव होते.

मे १९८३ च्या शेवटच्या आठवडय़ात वेणूताईंनी अंथरुण धरले. रात्री साहेबांना जागावे लागू नये म्हणून त्यांनी मला राहावयास बोलावले होते. मी बारा-एकपर्यंत त्यांना झोप येईतो जागत असे. २ जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. यानिमित्ताने वेणूताईंचे भाऊ-भावजय, पुतणे दिल्लीत आले होते. १ जूनला सकाळी नोकराला बोलावून त्यांनी उद्यासाठी काय काय आणायचे याची यादी आणि पैसे त्याला दिले. चपराशांच्या बायकांना बोलावून त्यांनी करावयाची कामे सांगितली. साधारणत: साडेदहाच्या सुमारास दवाखाना, अ‍ॅम्बुलन्स वगैरे गोष्टी त्यांच्या कानावर येऊ लागल्या. आपल्याला आज दवाखान्यात हलवणार असल्याचं त्यांना जाणवलं.

यशवंतरावांना त्यांनी जवळ बोलावून- ‘तुम्ही मला दवाखान्यात ठेवणार आहात का?’ असं विचारलं. ‘घरी उपचार करणं आता शक्य नाही..’ असं यशवंतरावांनी म्हणताच त्या म्हणाल्या, ‘मला हो की नाही, एवढंच सांगा.’ यशवंतरावांनी ‘हो’ म्हणताच काही सेकंदातच सकाळपासून हसत-खेळत, उत्साहात असलेल्या वेणूताई यशवंतरावांच्या अंगावर कोसळल्या आणि त्यांच्या कुशीतच त्यांची प्राणज्योत मालवली. १ जूनला सायंकाळी त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. २ जून १९४२ साली सवाष्णीचा साजशृंगार करून वेणूताईंनी चव्हाणांच्या घरात प्रवेश केला होता आणि बरोब्बर २ जून १९८३ रोजी तो उंबरठा ओलांडून त्या दूरच्या प्रवासाला निघून गेल्या. फरक एवढाच होता, की यावेळी प्रथमच यशवंतरावांच्या मागे चालण्याची प्रथा मोडून त्या पुढे आणि यशवंतराव मागे होते.

यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' या आपल्या चरित्र ग्रंथाची अर्पणपत्रिका वेणूताईंना अर्पण केली आहे. ''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी...'' असे भावनापूर्ण शब्द त्यांनी उच्चारले आहेत.

यशवंतराव आणि वेणूताई यांचा संसार अगदीच एखाद्या राजमहालात झाला नसला तरी एकमेकांचा विश्वास, नाते सांभाळण्याची समज अशा प्रत्येक गोष्टीत तो पुरेपूर होता. प्रेम म्हणजे काय हे महाराष्ट्रातील या जोडप्याकडे पाहुन लक्षात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT