विधानसभा 2019 : मुंबई : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. महाआघाडी आणि महायुती बाबत अजूनतरी कोणताही ठाम निर्णय झालेला नाही. त्यामुळे मित्र पक्ष आणि शत्रू पक्ष कोण याबाबत सध्यातरी नेतेच काय त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे प्रमुख राजकीय पक्ष वगळता इतर पक्ष कोणत्या गटाशी जोडले जाणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र, वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाण्यास नकार दिला आहे. मराठी माणसाचे प्रश्न मांडण्याची मनसेची भूमिका आपल्याला पटत नसल्याचे वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (ता.19) मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले, ''या निवडणुकांसाठी आमच्या पक्षातून 25 मुस्लीम उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात येणार आहे. आम्ही राष्ट्रवादी असून आमचा कोणताही प्रादेशिक आणि धार्मिक हेतू नाही. मनसेसोबत जाण्याबाबत मी यापूर्वीही भूमिका मांडली होती. आणि आताही माझी तिच भूमिका आहे.''
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे वंचित आणि एमआयएममध्ये फूट पडली. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याचे जलील यांनी औरंगाबाद येथे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आंबेडकर म्हणाले होते, ''एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत. त्यांनी स्वत:च त्यांचे दरवाजे बंद केले आहेत.''
एमआयएमने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे 98 जागांची मागणी केली होती. त्यानंतर किमान 74 जागा तरी द्याव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, दोन वेळा चर्चा करूनदेखील जागा वाटपांबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. असदुद्दीन ओवेसी यांच्याशी दोन आणि खासदार जलील यांच्याशी तीनवेळा बैठका होऊनही ठोस निर्णय न झाल्याने एमआयएमने स्वबळाचा नारा दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.