Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News
महाराष्ट्र बातम्या

मराठा क्रांती मोर्चाच्या आरोपांना संभाजीराजेंचं उत्तर; सविस्तर लिहिली पोस्ट

माझा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील

सकाळ डिजिटल टीम

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली. यानंतर ‘मी कधीही स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवले नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचा एक सेवक म्हणूनच कार्यरत राहिलो व यापुढेही राहीन. समाजासाठीचा माझा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील’ अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिली.

संभाजीराजे आमचे नेतृत्व करू शकत नाही. ते गादी आहेत त्या गादीचा आम्ही मान ठेवतो. परंतु, त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी डाव रचला आहे, असे औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले होते. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी नुमद प्रतिक्रिया फेसबुक पोस्टमध्ये लिहिली आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यानंतर समाजाचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणही केले होते. तत्कालीन नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन जी आश्वासने दिली होती ती आता मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारीने पूर्ण करावीत. असे निवेदन त्यांना दिले होते, असे संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला. हे त्या उपोषणाचेच यश आहे. समाजाच्या याच मागण्यांसाठी त्यांनी बैठक बोलाविली होती. बैठकीत सारथी संस्थेची स्वायत्तता, समाजासाठी अनेक योजना असे विषय मार्गी लागले. मात्र, बैठकीत काही लोकांनी शिष्टाचार पाळला नाही. मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काही जणांनी भर बैठकीत एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी केल्याने मी शांततेचे आवाहन केले. मात्र, हा प्रकार वारंवार होत राहिल्याने समाजाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा तुमचे हेच चालू राहणार असेल, तर अशा पातळीहीन बैठकीत बसण्यापेक्षा मीच बाहेर जातो, तुमचं चालुद्या; अशी भूमिका मला घ्यावी लागली. मी कधीही कुणाचा आवाज दाबणे शक्य नाही. परंतु, समाजाच्या नावाने उभे राहत असताना पातळीहीन वागून कुणी समाजाची नाचक्की करणार असेल, तर ते देखील मी सहन करू शकत नाही, असेही संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. २००७ पासून मी या चळवळीत पूर्णतः सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार सोडून, वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी महिनो महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो. संसदेत सुद्धा मराठा आरक्षणावर बोलणारा मी पहिला आणि कित्येक वर्षे एकमेव खासदार होतो. संसदेच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे, असेही संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

समाजाने नेहमीच प्रेम दिले, पाठबळ दिले

२०१७ साली मुंबई येथे मोर्चाचा स्टेजवर जाऊन समाजाला दिशा दिली. यामुळे आपले मोठे राजकीय नुकसान होणार याची कल्पना असूनही स्वतःपेक्षा समाजाचा विचार केला. आरक्षण रद्द झाल्यानंतर कित्येकांनी समाजाला हिंसक मार्गाला घेऊन जाऊन राजकीय स्वार्थ साधण्याची रणनीती आखली होती. तेव्हा समाजाला वस्तुस्थिती दाखवून सनदशीर मार्गाने हा लढा पुढे नेला. समाजानेही नेहमीच मला प्रेम दिले, पाठबळ दिले, असेही असेही संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

फार काळ समाजाला असे फसवू शकत नाही

कोपर्डीच्या भगिणींना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चा हा सध्या काही जणांनी कुठे नेऊन ठेवलाय, हे समाज उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. वेगवेगळ्या पक्षांशी व नेत्यांशी संधान बांधून अनेकांनी वैयक्तिक स्वार्थ साधून घेतले. पाठीशी काहीही कार्यकर्ते अथवा संघटनात्मक ताकद नसताना देखील केवळ समाजाच्या नावावर आपल्या पोळ्या भाजल्या. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील कित्येक राजकीय नेत्यांनी देखील जाणीवपूर्वक अशा लोकांना खतपाणी घातले व आजही घालत आहेत. पण समाज डोळस आहे. तुम्ही फार काळ समाजाला असे फसवू शकत नाही, असे संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

समाजाची दिशाभूल करू नये

मराठा समाजाला कायद्याच्या कक्षेत टिकणारे आरक्षण मिळावे या मागणीसाठी मी गेले दीड दशक सर्व स्तरांवर लढा देत आहे. मग ते कसे द्यायचे हा सरकारचा विषय आहे. समाजासाठी कोणतीही मागणी करण्यास कुणालाही आमचा विरोध नाही व पुढेही असणार नाही. पण आपली मागणी करत असताना आरक्षण नेमके मिळवणार कसे, तेदेखील समाजाला सांगितले पाहिजे. केवळ आपले महत्त्व राखण्यासाठी समाजाची दिशाभूल करू नये, असे संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

मराठा समाजाला आरक्षण हे द्यावेच लागेल

कोणतेही आरक्षण द्यायचे असल्यास आणि ते न्यायालयात टिकवायचे असल्यास मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करावेच लागेल, हे सत्यच आहे आणि ते कुणीही नाकारू शकत नाही. एकदा मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सरकारला मराठा समाजाला आरक्षण हे द्यावेच लागेल आणि न्यायालयात सुद्धा ते टिकेल. पण हे सत्य न सांगता अधांतरी एखादी मागणी करून कुणीही समाजाचे नुकसान करू नये, असे संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे

फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे. शेतशिवारात राबणारा शेतकरी, विविध क्षेत्रांत मेहनतीने काम करणारा कष्टकरी, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या माझ्या माता भगिनी म्हणजे माझा मराठा समाज आहे. पंधरा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून, तळागाळात काम करून, समाजासाठी लढा देऊन, स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रथम विचार करून त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ कमावले आहे, ते कुठल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे कमी होणार नाही, असे संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील

माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले. परंतु, कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवले नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचा एक सेवक म्हणूनच कार्यरत राहिलो व यापुढेही राहीन. समाजासाठीचा माझा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील, असे संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT