marathi actress mayuri wagh interview
marathi actress mayuri wagh interview 
मनोरंजन

भूमिका हवी "अस्मिता'च्या तोडीची... 

अरुण सुर्वे

लहानपणापासूनच मला नृत्याची आवड होती. त्यामुळे मी डोंबिवलीमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असे. खरं तर वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी भरतनाट्यम्‌चं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नृत्यामध्येचं करिअर करावं, असं मला नेहमीच वाटत असे. शिक्षणाबरोबरच नृत्यावरही भर देत होते. केळकर महाविद्यालयात मी बी. ए. अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली. त्यानंतर वेलिंगकर महाविद्यालयात एच.आर.मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. हे शिक्षण घेत असतानाच मी दोन्हीही महाविद्यालयांतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. सुरुवातीला मी "साईड डान्सर' म्हणून काम करू लागले; पण आपणही इतरांप्रमाणे सर्वांसमोर आणि मध्यभागी उभे राहून नृत्य करावे, असे वाटू लागले. त्यानंतर मी मध्यभागी उभे राहून नृत्य करू लागले आणि त्यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला. खरं तर नृत्य करताना मला अभिनयाचीही गोडी लागली. 
अभिनय क्षेत्रामध्ये मला पहिला ब्रेक "वचन दिले तू मला' या मालिकेमुळे मिळाला. त्यानंतर सयाजी शिंदे यांची निर्मिती असलेल्या "माझी माणसं' या चित्रपटातही अभिनय करण्याची संधी मिळाली. यात मी सयाजी शिंदे यांच्या मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर "हाऊसफुल्ल', "सुगरण' या शोंचं निवेदनही केलं. दरम्यानच्या कालावधीत "मांगल्याचं लेणं', "सोहळा गोष्ट प्रेमाची' या नाटकांमध्येही अभिनय केला. त्याचबरोबर "कॉमेडी एक्‍स्प्रेस', "या वळणावर', "मेजवानी- परिपूर्ण किचन' यामध्येही काम केलं. "मन्या- द वंडर बॉय' या चित्रपटामध्येही अभिनयाची संधी मिळाली. 
त्यानंतर अभिनय क्षेत्रातून मी दोन वर्षे ब्रेक घेतला होता. त्या कालावधीत मी फक्त जाहिरातींसाठीच काम करत होते. "हारपीक', "डाबर च्यवनप्राश' यांसह विविध मसाले आणि इतर जाहिरातींमध्येही काम केलं. तसेच, दाक्षिणात्य वाहिन्यांवरील जाहिरातींमध्येही काम केलं. 

मला खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक मिळाला तो "अस्मिता' या मालिकेमुळे. खरं तर "अस्मिता' हीच माझ्या करिअरची टर्निंग पॉईंट ठरली. यात मी डिटेक्‍टीव अस्मिताची मुख्य भूमिका साकारत होते. या मालिकेतून आम्ही अन्याय-अत्याचारांना वाचा फोडली. खरं तर याच मालिकेमुळे मी घराघरांत पोहोचले. त्यामुळे सर्व जण मला अस्मिता याच नावानेच ओळखू लागले. ही मालिका तब्बल तीन वर्षे सुरू होती. आणि तिला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 

दरम्यान, अभिनेता पियुष रानडे याच्याबरोबर माझं लग्न झालं. त्यामुळे मैत्रीचं नातं प्रेमात आणि नंतर गृहिणीच्या भूमिकेत बदललं. लग्नानंतरही पियुष मला खंबीर साथ देतोय. त्याचबरोबर सासू-सासऱ्यांचाही पाठिंबा मिळत आहे. हेच कर, तेच कर... असा सल्ला मला ते कधीही देत नाहीत. तसेच, कोणतंही बंधन माझ्यावर लादलं जात नाही. अभिनयाचा प्रवास सुरू असताना माझ्या आई-वडिलांनीही मला प्रोत्साहन दिलं. ज्या वेळी मी नाटकांमध्ये आणि टीव्हीवर छोट्या-छोट्या भूमिका साकारत होते, त्या वेळी माझी आई माझ्याबरोबर यायची. विशेष म्हणजे घरी आल्यावर तीच जेवण बनवून घर आवरत असे. सकाळीच उठून भावाचा डबाही बनवत असे. पण तिने याबाबत कधीही तक्रार केली नाही. खरं तर माझ्यापेक्षा आई-बाबांनीच माझ्यासाठी खूप त्रास सहन केला. 

सध्या नाटक, चित्रपट आणि मालिकांसाठी मला अनेक संधी येत आहेत; मात्र मला "अस्मिता'च्या तोडीचीच भूमिका साकारायची आहे. तसेच दाक्षिणात्य भाषेतही अभिनय करायचा आहे. कारण, तिथली कामाची पद्धत खूपच चांगली आहे. तिथे अभिनय करणं मला नक्कीच आवडेल. सध्या बॉलीवूडचा विचार केला नसला, तरी चांगली भूमिका मिळाल्यास त्याचाही नक्कीच विचार करीन. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT