औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशाच्या यंदा ३४ हजार ९२९ जागा रिक्त आहेत. राज्यात प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत, त्यापैकी केवळ ६८ हजार ६५२ जागांवरच प्रवेश झाले आहेत.
आरटीईनुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना पहिली ते आठवीमध्ये मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागेवरील मोफत प्रवेशासाठी राज्यभरातून २ लाख २२ हजार ५८४ पालकांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. पहिल्या फेरीत नाव आलेल्या एकूण ६१ हजार १२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. यामध्ये केवळ ७ हजार ५२९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश पूर्ण केले. दोन्ही फेऱ्यानंतर अजूनही २८ हजार ३२ जागा रिक्त आहेत. पालकांमध्ये मोफत प्रवेशाबाबत दिवसेंदिवस उदासीनता वाढू लागली आहे.
ही आहेत कारणे
दरवर्षी सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांना याअंतर्गत प्रवेश दिला जातो. परंतु, सरकारने मागील तीन ते चार वर्षांपासून शाळांना परतावा दिला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आर्थिक अडचणीत आले आहे. इंग्रजी शाळांना एका विद्यार्थ्यामागे शासनाकडून १४ हजार पाचशे रुपये खर्च दिला जात होता. मात्र यावर्षीपासून त्यामध्ये निम्म्याने कपात केली. त्यामुळे संस्थाचालकांकडूनही आरटीईबाबत उदासीनता आहे. याचा परिणाम देखील प्रवेशावर झाला असल्याचे मेस्टाचे अध्यक्ष संजयराव तायडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
आकडे बोलतात
राज्यात आरटीई लागू शाळा - ९,४३२
एकूण जागा - ९६,६८४
पहिल्या फेरीत झालेले प्रवेश - ६१,१२३
प्रतीक्षा यादीतून झालेले प्रवेश - ७, ५२९
एकूण प्रवेश - ६८ हजार ६५२
रिक्त जागा - २८ हजार ३२
अर्ज केलेले पालक - २ लाख २२ हजार ५८४
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.