संत जनाबाई
संत जनाबाई sakal
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Muktisangram 2023 : मराठवाड्याची पुण्याई...संत जनाबाई, बहिणाबाई अन् मुक्ताबाई...

सकाळ वृत्तसेवा

मराठवाड्याच्या मातीत जन्माला आलेल्या संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत सोपाननाथ, संत एकनाथ महाराज, संत बहिणाबाई यांनी जगाला विश्व कल्याणाचा मार्ग दाखवला. संत जनाबाई, संत मुक्ताबाई आणि संत बहिणाबाई यांनी त्यांच्या अभंग गाथांमधून महिलांप्रति असलेल्या अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठवला आहे.

त्यांनी करून ठेवलेले कार्य आजही समाजाला दिशा दर्शक ठरत आहेत. संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई शिऊर वैजापूरच्या, जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांचे मूळगाव हे आपेगाव, पैठण तालुक्यातील. या सर्व संतांनी त्यांच्या ज्ञानाने संपूर्ण जगाला माणुसकीचा संदेश दिला आहे. मराठवाड्याच्या सामाजिक विकास पाया या संतांच्या विचारसरणीवर आधारित आहे. हे खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल तर मराठवाड्याच्या मातीत जन्माला आलेल्या थोर संतांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठवाड्यातील संतांच्या अभंगातून येथे मांडण्याचा हा प्रयास...

रेणुका कड

१२ व्या शतकातील संत जनाबाई या मूळ परभणी, गंगाखेडच्या. संत जनाबाई यांच्या बालपणीचा इतिहास पाहिला तर संत जनाबाईला त्यांच्या आईवडिलांनी लहानपणी वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे कामासाठी पाठवले. आजच्या काळात आपण याला बालमजुरी म्हणू शकतो. संत नामदेवांच्या घरी राहून त्याच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

संत जनाई विठ्ठल भक्त. काम करत करत त्या विठ्ठलाचे नामस्मरण करत. त्यांचे अभंग साक्षात विठू माऊलीने लिहिण्याचे उल्लेख संत साहित्यात आणि इतिहासात सापडतात. जनाई संत नामदेवाच्या घरी राहत असल्या तरी गावातील तथाकथित लोकांकडून त्यांना हालउपेक्षा सोसावी लागली. जनाईचा आणि विठ्ठलाचा काय संबंध म्हणून त्यांना प्रश्न केला गेला. या प्रश्नाला जनाईने त्यांच्या अभंगांतून उत्तर दिले आहे,

जनाई म्हणते,’ देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥

देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥

देव येथें देव तेथे । देवाविणें नाहीं रीतें ॥३॥

जनी म्हणे विठाबाई । भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥

बाराव्या शतकात इतक्या परखडपणे जनाईने तथाकथित लोकांना त्यांच्या अभंगांतून

समज दिली आहे. जनाबाई ही तर वारकरी चळवळीतील अत्यंत बंडखोर स्त्री संत म्हणून ओळखली जाते. संत नामदेव हे वारकरी चळवळीचा विस्तार करण्यासाठी संपूर्ण देशात फिरत होते. त्यांचा जास्तीत जास्त काळ त्यांनी पंजाबमध्ये व्यतीत केला आहे. तेव्हा

पंढरपूरमध्ये वारकरी चळवळीचे नेतृत्व जनाबाई यांनी केले.

एका स्त्रीने केलेले नेतृत्व तथाकथित परंपरावाद्यांना कधीही सहन झाले नाही. परंतु जनाबाई खंबीरपणे तत्कालीन परिस्थितीच्या विरुद्ध लढत राहिल्या. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या कर्तृत्वावर बोटं ठेवता येत नाहीत, तेव्हा तिच्या राहणीमानावर बोट ठेवले जाते. जनाबाईंच्या बाबतीत नेमके हेच झाले. त्या डोक्यावर नीट पदर घेत नाही, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जाऊ लागला, तेव्हा जनाबाईंनी थेट व्यवस्थेलाच आव्हान दिल्याचे त्यांच्या अभंगांतून दिसते.

डोईचा पदर आला खांद्यावरी।

भरल्या बाजारी जाईल मी॥

हातामध्ये टाळ,  खांद्यावरी वीणा।

आता मज मना कोण करी॥ जनाबाई असे आव्हान देते.

स्त्री म्हणून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबद्दलही नाराजी व्यक्त करते. तेवढे करून त्या थांबत नाही, तर इतर स्त्रियांना प्रोत्साहन देताना स्त्रीचा देह मिळाला म्हणून उदास होऊ नका, असा आशावाद जागविताना म्हणते -

स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास।

साधू- संता ऐसे केले जनी॥

अशा शब्दांत इतर स्त्रियांना आत्मभान देते.

संत मुक्ताबाई यांचा (आपेगाव, ता. पैठण) येथे जन्म झाला. लहानपणीच पालकांचे छत्र हरवले होते. त्यामुळे आपल्या तीन भावंडांसोबत मुक्ताबाई त्यांची मुक्ताई होऊन जगल्या. चौदाशे वर्षे जिवंत राहून ज्ञान मिळवणाऱ्या चांगदेव महाराजांच्या गुरू झाल्या! मुक्ताई अंघोळ करून येत असताना चांगदेव महाराज येतात आणि त्या मुक्ताबाई यांना त्या अवस्थेमध्ये पाहून त्यांचे डोळे बंद करून घेतात आणि तिथून वापस निघून जातात.

हा प्रसंग मुक्ताबाई तिन्ही भावांसमोर सांगते आणि त्यांना म्हणते की, तू चौदाशे वर्षांचा आहेस; पण तुझ्या मनाचा भ्रम झाला नाही. असे कठीण आणि महान योग साधन तुम्ही केले तरीही आता आत्मतत्त्वाची ओळख नाही झाली. स्त्री-पुरुष भेदाची भावना ज्ञानीमध्ये नसते. इतके प्रखरपणे स्त्री-पुरुष भेदाची भूमिका मुक्ताई तेव्हाच्या काळात मांडतात.

संत बहिणाबाई यांचा जन्म गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्‍यातील वेळगंगा नदीच्या काठी देवगाव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये झाला. संत बहिणाबाईंना विठ्ठल भक्तीचे वेड होते. संत तुकारामांचे कीर्तन ऐकून त्यांनी तुकोबांना आपले गुरू मानले होते. पण एका ब्राम्हण स्त्रीने शूद्र, कुणबी असणाऱ्या संत तुकारामांचे शिष्यत्व पत्करावे ही गोष्ट त्या काळातील मंबाजीसारख्या तत्कालीन स्वयंघोषित धर्मपंडितांना पचनी पडणारी नव्हती. यामुळे मंबाजीने त्यांचा खूप छळ केला. पण त्यांनी आपली तुकोबांविषयीची दृढ निष्ठा आणि भक्ती सोडली नाही. त्यामुळे त्यांना अनेक वेळा पतीचा रोष, मारहाणही सहन करावी लागली. संत बहिणाबाई आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगांत करताना दिसतात. बहिणाबाई म्हणतात,

तुका सद्‍गुरू सदोहर, भेटतो अपार सुख होवो,

मराठवाड्यातील या संत महिलांनी केलेले कार्य आजच्या काळातही जसेच्या तसे लागू होते. आजच्या काळात स्त्री जेव्हा एकटीने काही करू पाहते तेव्हा तिला दूषणे दिली जातात, संसार करून परमार्थचा मार्गावर चालताना आपला गुरू कोण असावा किंवा आपण ज्यांना गुरू मानतो त्यांचे शिष्यत्व घेताना धीराने अडचणीवर मात करत संत बहिणाबाई भक्तिमार्गात लीन होतात. आणि स्वत:च्या आवड जपत असताना तारेवरची कसरत करावी लागते.

त्यांनी जगाला दिलेली शिकवण मार्गदर्शक आहे. संत जनाई, संत मुक्ताई आणि संत बहिणाबाई या तिन्ही स्त्रियांच्या रूढी परंपरेचा तीव्र विरोध मोडून, रोष सहन करून जगाला दिशा दाखवली आहे. या स्त्री संतांनी कधी प्रेमाने, कधी रागाने, तर कधी टोकाला जाऊन तत्कालीन व्यवस्थेशी आपला संघर्ष मांडत उभ्या राहतात. आजच्या काळातील प्रामुख्याने मराठवाड्यातील एकल महिलांची परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही.

(लेखिका सामाजिक क्षेत्राच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT