कळमनुरी (जि. हिंगोली) : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर माठ विक्रीचा व्यवसाय करण्याकरिता शहरात मध्यप्रदेशातील माठ विक्रेते आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे या कुटुंबीयांची होणारी गैरसोय लक्षात घेता कळमनुरीचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी त्यांना एक महिना पुरेल एवढे धान्य देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.
उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर शहरात माठ विक्री करण्याकरिता मध्यप्रदेशातील व्यवसायिकांनी पंधरा दिवसांपूर्वी जुने बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला दुकान थाटले आहे. काही वर्षांपासून मध्यप्रदेशामधील हे व्यवसायिक शहरात उन्हाळ्याच्या दिवसात माठ विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी येतात. उन्हाळा चालू झाल्यानंतर त्यांनी एक महिन्यापूर्वी रस्त्याच्याकडेला दुकान थाटले आहे.
व्यवसाय झाला ठप्प
येथे आलेल्या या व्यवसायिकांच्या कुटुंबातील एकूण पाच सदस्य व एक मुलगी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वास्तव्याला राहून व्यवसाय करीत होते. मात्र कोरोना विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. मागील पंधरा दिवसात एक रुपयांचाही व्यवहार झाला नाही. त्यामुळे हे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. माठ विक्री होत नसल्यामुळे आणलेल्या मालाचे करायचे काय व बंदच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या अवस्थेत हे कुटुंब सापडले होते.
तहसीलदारांनी बाजारपेठेची केली पाहणी
दरम्यान कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होते किंवा नाही हे पाहण्यासाठी तहसीलदार कैलास वाघमारे, नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, एस. जी. बेले हे शहरामध्ये मंगळवारी (ता.२४) पाहणी करीत होते. या वेळी त्यांनी रस्त्याच्या कडेला माठ विक्रीकरिता आलेल्या विक्रेत्यांशी चर्चा केली. या वेळी या कुटुंबाने शहरातील बंद दरम्यान व्यवसाय पूर्ण ठप्प झाला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, याची कैफियत मांडली.
धान्य देण्याच्या सूचना
या व्यावसायिकाची व्यथा ऐकून तहसीलदार श्री. वाघमारे यांनी तातडीने एक महिन्याचे धान्य देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. यासोबतच त्यांनी रस्त्याच्या कडेला वास्तव्याला असणाऱ्या गोसावी, पारधी व घिसडी कुटुंबीयांशीही संपर्क साधून त्यांना आवश्यक ते धान्य देण्याच्या सूचना केल्या. आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जमावबंदी सुरू असल्यामुळे उघड्यावर जीवन जगणाऱ्या कुटुंबांना आधार देण्याचे काम तहसीलदार श्री. वाघमारे यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे किराणा दुकान दोन तास उघडे ठेवा
कळमनुरी : कोरोना विषाणूजन्य संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जमावबंदी लागू आहे. भाजीविक्रेते व किराणा दुकानावरून नागरिकांची होत असलेली गर्दी पाहता तहसीलदारांनी नवीन नियमावली तयार केली असून भाजी विक्रेत्यांना एका ठिकाणी भाजी बसून विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. किराणा दुकान केवळ दोन तास सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
नियमावली केली तयार
कोरोना विषाणूजन्य संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात लॉकडाउन केले आहे. सर्वत्र जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान, नागरिकांची अडचण होणार नाही, याची काळजी घेत जीवनावश्यक भाजीपाला, दूध विक्री, किराणा दुकान, पेट्रोलपंप आदींना सूट दिली आहे. मात्र नागरिकांकडून या ठिकाणी खरेदी करताना शासनाकडून देण्यात आलेले नियम पाळले जात नसल्याचे तहसीलदार कैलासंचंद्र वाघमारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मंगळवारी (ता.२४) नवीन नियमावली तयार केली आहे.
दोन तास दुकान उघडण्यात यावे
दररोज दुकान उघडण्या ऐवजी एक दिवस आड तेही केवळ दोन तास दुकान उघडण्यात यावे, ग्राहका शिवाय दुकानात आलेल्या रिकामटेकडे व्यक्ती व दुकानदारांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी, पेट्रोल पंप चालकांनी अनावश्यक गर्दी टाळून एका वेळी तीन ग्राहकांना पेट्रोल देण्यासाठी सोडण्यात यावे, याकरिता पेट्रोल पंपाच्या प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी नियमावली पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.