मुंबई : कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये अन्य गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना भरती करून घेतले जात नाही. अशा रुग्णांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत असून, त्यातूनच अशा रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वी अंधेरी येथील कर्करोगग्रस्त शिवाजी सावंत यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे एखादी व्यक्ती मृत पावल्यास ती ब्रेकिंग न्यूज होते. मग इतर आजाराने उपचाराविना मरणाऱ्यांचे काय? असा सवाल करत सेवानिवृत्त तहसीलदार श्रीकृष्ण गोसावी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र धाडले आहे.
शिवाजी सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. 13 मे रोजी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी त्यांना रिक्षातून जवळील ट्रॉमा रुग्णालयात नेले. परंतु तेथे खाटाच उपलब्ध नसल्याने रुग्णालयाने त्यांना भरती करून घेतले नाही. तेथून कुपर रुग्णालय नेले असता तेथेही त्यांना कोणी दाद दिली नाही. अखेर सावंत यांना नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे अनेक तास तातकळट ठेवण्यात आले. यापूर्वीपासून त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू असताना तेथील डॉक्टरांनीही सावंत यांच्यावर उपचारास नकार दिल्याने सावंत यांच्या पत्नी मीनल यांनी सांगितले.
मीनल यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, पतीची तब्येत अधिक बिघडल्याने तसेच नानावटीमध्येही उपचारास नकार दिल्याने त्यांना दोन रुग्णालये फिरून हॉली स्पिरिट रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारात त्यांच्या छातीत कफ सुकल्याचे निदर्शनास आले. परंतु काही वेळाने रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही, असे सांगून रुग्णालय सोडण्यास सांगितले. त्यानंतर उमा नर्सिंग होम याठिकाणी त्यांना उपचारासाठी नेले असता तेथेही उपचारास नकार देण्यात आला.
अखेर सावंत यांना पुन्हा नानावटी रुग्णालयामध्ये आणले. मात्र, रुग्णालय प्रशासन रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार देत होते. तेव्हा स्थानिक नेत्याची मदत घेऊन नानावटीमध्ये सावंत यांना भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांचा रक्तदाब (बीपी) वाढला होता. सावंत यांची प्रकृती आणखी गंभीर झाली. अखेर 14 मेला त्यांची प्राणज्योत मालवली. मीनल सावंत यांच्या मदतीस स्वतः श्रीकृष्ण गोसावी सोबत होते. त्यामुळेच गोसावी यांनी उद्वीग्न होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे.
गोसावी यांनी काय म्हटले आहे पत्रात...
पतीवरील उपचारासाठी 13 मे रोजी आम्ही वणवण फिरलो. तरीही आमची कोणाला दया आली नाही. उपचारांना उशिर झाल्याने माझ्या पतीला प्राण सोडावे लागले. कोरोनामुळे कर्करोग आणि अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. हा अनुभव खूप वेदनादायी आहे.
- मीनल सावंत,
शिवाजी सावंत यांच्या पत्नी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.