ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील दुकानेही 15 ऑगस्टपासून खुली करण्यात आली आहेत. त्यातच उल्हासनगर महापालिकेनेही बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही शहरांना लागून असलेल्या कल्याण-डोंबिवलीत मात्र दुकाने बंदच आहेत.
सर्वांचा आवडता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक घडी विस्कटलेल्या व्यापाऱ्यांना गणेशोत्सवात कुठेतरी कमाईचा आशेचा किरण दिसत असताना प्रशासनाने अद्याप कोणताच निर्णय न घेतल्याने कल्याण-डोंबिवलीतील व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे किमान आता तरी प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
ठाणे शहरात आठवड्यातील सातही दिवस दुकाने खुली ठेवण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. त्यानुसार ठाण्यातील दुकाने 15 ऑगस्टपासून खुली झाल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईनंतर ठाण्यातील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असताना या शहरांना लागूनच असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनाही प्रशासनाने दिलासा द्यावा, पालकमंत्र्यांनी या शहरांतील व्यापाऱ्यांच्याही समस्या सोडवाव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
राज्य सरकारच्या नियमांचे पालन करीत सध्या आस्थापने सम-विषय तारखांनुसार सुरू आहेत; परंतु सण उत्सवांचे दिवस असून दुकान एक दिवस बंद राहिल्यानेही नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यामुळे सुरुवातीचे दोन दिवस व गौरी आगमन या दिवशीच प्रामुख्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाने किमान गणेशोत्सवात तरी शहरातील सर्व व्यावसायिकांना दुकाने दररोज खुली ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
जुलै महिन्यापासून कल्याण-डोंबिवलीतील व्यापारी पालिका प्रशासनाकडे दुकाने दररोज खुली ठेवण्यास परवानगी मागत आहेत; परंतु गणेशोत्सव तोंडावर आला तरीही प्रशासनाने अद्यापही याविषयी निर्णय घेतलेला नाही. मुंबई, ठाण्याप्रमाणेच प्रशासनाने कल्याण-डोंबिवलीचाही गांभीर्याने विचार करावा.
- श्रीपाद कुलकर्णी, व्यापारी
उल्हासनगरातील बाजारपेठा पुन्हा गजबजणार
--------------
(संपादन : प्रणीत पवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.