ठाणे : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरीही वाहतूकसेवा मात्र सुरळीत सुरु नाही. लोकलसेवा बंदच असल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी, बस आणि खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. बससाठी रांगेत ताटकळत उभे राहणे, वाहतूक कोंडी, खासगी बस चालकांनी चालवलेली लूट यामुळे डोंबिवलीकरांच्याही सहनशीलतेचा अंत होत आहे. नालासोपारा येथे चाकरमान्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले, याची पुनरावृत्ती कल्याण-डोंबिवली परिसरातही होऊ शकते, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांसाठीही लोकल सेवा सरकारने सुरु करावी, अशी मागणी चाकरमानी करत आहेत. कोरोना संक्रमण काळात मुंबईतील लोकल वाहतूक ठप्प आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारने शासकीय तसेच खासगी कार्यालयांना काही निर्बंध घालत कार्यालये सुरु केली. परंतू खासगी कर्मचाऱ्यांसाठी मात्र वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध केली नाही. ठाण्याच्या पलिकडे राहणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई गाठायची असेल तर त्यांच्या वाहतूकीचा सर्वाधिक भार उचलणाऱ्या रेल्वेच्या तुलनेत अद्याप प्रभावी पर्यायी सेवा नाही. याचाच फटका सध्या लॉकडाऊन काळात चाकरमान्यांना बसत आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना शहरांत पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला तरी कार्यालये मात्र सुरुच होती. आता काही भागातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांनाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर सर्वसामान्य चाकरमान्यांना परवानगी का नाही. आत्ताच्या घडीला मुंबई, ठाण्यातील बहुतांश दुकाने, छोटेमोठे उद्योग सुरु झाले असून, त्यामध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग हा ठाणे पल्याड राहातो. बसने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शासनाने रेल्वे सेवा सुरु करावी. अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. बुधवारी नालासोपारा येथील नागरिकांनी आंदोलन केले तसेच ठाणे पल्याडच्या स्थानकांतही होऊ शकते, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
खासगी वाहनांची सुविधा सुरु आहे, पण या बसेसचे भाडे पहाता सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. काही चाकरमान्यांना कंपनीने प्रवासभाडे दिल्याने त्यांचा प्रवास या खासगी वाहनाने होतो, परंतू इतरांचे काय? त्यांना तासनतास रांगेत आजही उभे रहावे लागत आहे. बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते असे सरकारला वाटते, तर तसेच रेल्वेतही होईल. प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता वाहतूक व्यवस्थेचा विचार केला गेला पाहीजे.
- अमोल बांगरे, प्रवासी
एसटीने प्रवास करायचा तर ती मुंबई गाठण्यासाठी ठाणे येथे ती बदलावी लागते. खासगी बसने प्रवास करायचा पण महिन्याचा खर्च पहाता तेवढा पगारही नाही आम्हाला. कंपनी प्रवासभत्ता देत नाही. शिवाय रोजची वाहतूक कोंडी, जास्तीचा वेळ यामुळे आता बसचा प्रवास नकोसा वाटतो. अनलॉकच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे, तर मग रेल्वे प्रवासाची परवानगी सर्वांना द्यावी. सरकारी कार्यालयांबरोबरच खासगी कार्यालये, दुकाने, कारखानेही सुरु झाले असून खासगी कर्मचाऱ्यांचा प्रवासाची सोय काय याचा विचार शासनाने करावा. नालासोपारावासियांनी केले ते योग्यच आहे, किमान शासनाचे डोळे तरी उघडतील.
जगन्नाथ अहिरे, प्रवासी
--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.