मुंबई: आपले वजन दररोजच्या आहार आणि आचार ( चांगल्या वाईट सवयी ) यावर अवलंबून असते तसेच काही प्रमाणत अनुवांशिकतेचा सहभाग असतो. मात्र, आठ महिने लॉकडाउन झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या वजनात वाढ झाली आहे.
एका वैद्यकीय अहवालानुसार भारतामध्ये मुख्यतः शहरातील 25 ते 30 टक्के नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा वाढले आहे. या वाढलेल्या वजनामुळे अनेकांना झोपेमध्ये घोरण्याचा त्रास सुरु झाला असून त्यांच्या कुटुंबीयांची झोप उडाली आहे. घोरणं ही केवळ शेजारी झोपणाऱ्या व्यक्तीची झोपमोड करणारी बाब नसून त्यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीच्या अनारोग्यपूर्ण शारीरिक अवस्थेचे निरीक्षण होते. त्यामुळे, घोरण्याकडे वेळीच लक्ष पुरवून हा आजार आहे हे मान्य करणं महत्त्वाचं ठरतं; नाहीतर विविध गंभीर आजारांबरोबरच घोरण्यामुळे मृत्यू ओढवण्याचं प्रमाणही मोठं असल्याचं जगभर झालेल्या संशोधनांमधून दिसून आलं आहे.
मुलुंडच्या अपेक्स रुग्णालयात गेल्या महिन्याभरात झोप पूर्ण न झालेले तसेच घोरण्यामुळे श्वसन विकार झालेल्या रुग्णांमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अॅपेक्स रुग्णालयाचे सल्लागार एमडी फिजिशियन, संसर्गजन्यरोगतज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर यांनी सांगितले की, " घोरणे आणि शरीरातील अतिरिक्त वजन या दोन बाबी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, कारण घोरण्यामुळे अपुरी झोप होते. अपुरी झोप झाल्यामुळे शरीरातील शक्ती कमी होते आणि अवेळी भूक लागते. त्यामुळे अनके नागरिक बाजारामध्ये झटपट उपलब्ध असलेले तेलकट पदार्थ म्हणजेच फरसाण, वडा, सामोसा कचोरी आणि इतर फास्ट फूडचे सेवन करतात आणि त्यामुळे परत वजन वाढते आणि ही प्रक्रिया सुरु राहून वजनावर कोणतेच नियंत्रण राहत नाही.
साधारणपणे 80 टक्के नागरिकांमध्ये लठ्ठपणा हे घोरण्याचे कारण आहे. तसेच, ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया या समस्येमुळे घोरण्याचा त्रास होतो. झोपेच्या चार ते पाच तास आधी मद्यपान केल्याने घोरण्याची समस्या वाढण्याची शक्यता आहे. सामान्यत: जे लोक घोरत नाहीत, ते मद्यपान केल्यावर घोरण्यास देखील सुरुवात करतात, कारण मद्यपान घश्याच्या स्नायूंना अरुंद करते ज्यामुळे घोरणे सुरू होते असे आमच्या निदर्शनास आढळून आले आहे. लॉकडाऊन काळात अनेक जणांनी मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान केल्याचे समोर येत आहे अशा नागरिकांना घोरण्याचा त्रास सुरु झाला आहे. सहा ते आठ महिने घरी राहिल्यामुळे अनेक नागरिकांचे वजन वाढले आहे यामध्ये 50 ते 70 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे."
शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक आणि हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी सांगितले की, "न घोरणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत घोरणाऱ्या नागरिकांमध्ये स्लीप ऍप्नियामुळे मरण पावण्याचा धोका 40 टक्क्यांनी अधिक असतो. कारण, घोरण्याचा संबंध हा आरोग्याच्या अनेक समस्यांशी असतो. त्यात हृदयविकारापासून नैराश्यापर्यंतच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचा समावेश असतो, घोरण्याचा संबंध हा कॅरोटिड अथेरोस्क्लेरॉसिसशी म्हणजेच चरबी साठल्यामुळे गळ्यातील रक्तवाहिन्या अरुंद होण्याच्या आजाराशी असतो आणि यातूनच हृदयविकाराचा जोरदार धक्का येण्याचा संभव असतो. म्हणजेच थोडक्यात, रोज रात्री तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात आणि दीर्घ काळ घोरत असाल तितका तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते. दीर्घ काळ घोरत राहाण्याचा किंवा स्लीप ऍप्नियाचा विकार असलेल्या लोकांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित पडण्याचा धोका असतो."
--------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Lockdown Effect sleep disturb 20 percent increase
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.