mhada
mhada esakal
मुंबई

MHADA : म्हाडाची मुंबईतील घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; किंमती गगणाला भिडल्या

रवींद्र देशमुख

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता नोंदणी सोमवार (ता.२२) पासून सुरु झाली. मात्र या घरांच्या किमतींमध्ये झालेली वाढ पाहता ही घरे आता सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचे चित्र आहे.

गृहनिर्माण प्रकल्पांची वाढती संख्या, जागेचा अभाव आणि शहरांमध्ये घरांच्या वाढत्या किमती यामुळे सर्वसामान्यांना खाजगी विकसकाकडून घर घेणे शक्य होत नव्हते. अशातच मुंबई आणि महानगर क्षेत्रात घरांची मागणी वाढत असताना मात्र प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर असावे आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे याचसाठी म्हाडाची स्थापना झाली. मात्र मुंबई मंडळातील घरांच्या किमती पाहता आता म्हाडाची घरे देखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत.

घरांच्या किमती ३० लाख ते साडेसात कोटींच्या घरात

पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या पहाडी गोरेगाव येथील अत्यल्प गटातील घरांच्या किमती ३० लाख ४४ हजार रुपये आहेत. तर अत्यल्प गटासाठी असणारी घरे २६ लाख ते ४० लाखांच्या घरात आहेत. तर अल्प गटासाठीच्या घरांच्या किमतीही ४५ लाखांपासून पुढे दीड कोटीच्या वर आहेत.

पंतनगर, घाटकोपर येथील अल्प गटातील ८१ ते ८२ लाख रुपयांपर्यंत आहेत. दादरमधील अल्प गटातील घरे १ कोटी ६२ लाखांना आहेत. मध्यम गटासाठीची घरेही ८० लाख ते अडीच कोटींना आहेत.जुहू, अंधेरी आयडीएल अपार्टमेंटमधील घरांच्या किमती या दोन कोटी ५३ लाख, २ कोटी ८९ लाख रुपये इतकी आहे. उच्च गटातील घरांच्या किमती तीन ते साडेसात कोटींच्या घरात आहेत.

उत्पन्न मर्यादा

अल्प गटासाठी वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंत, अल्प गटासाठी ९ लाख रुपयांपर्यंत, मध्यम गटासाठी १२ लाख अशी उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे. तर उच्च गटासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मात्र उत्पन्न मर्यादा आणि सदनिकांच्या किमती पाहता विजेत्यांना गृहकर्ज मिळण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईत म्हाडाला खूप फ्लॅट्स मिळायला हवे. किमती वाढविल्याची जी आकडेवारी समोर येतेय या किमती वाढविण्याची कारणे नेमकी कोणती आहेत. महागाई वाढली आहे का? हे सरकारने कबुल करावे. सिमेंट वाढलं, स्टील वाढलं, नेमकं काय वाढलं? या इमारतींचे काम कधी सुरु झाले होते. तेव्हाचा रेट नेमका काय होता? जेव्हा इमारत बांधायला घेतली जाते तेव्हा टेंडरमध्ये त्या इमारतीची किंमत असते. अचानक या किमती कशा वाढल्या? गरिबांच्या तोंडातले घास काढून घेणं आहे. सरकारने म्हाडाला कारणे विचारावी की कोणाच्या परवानगीने या किमती वाढवल्या?

- आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहनिर्माण मंत्री

म्हाडाचा उद्देश पैसे कमावणे नाही. आजच्या परिस्थितीतही परवडणारी घरे देणे हा म्हाडाचा उद्देश आहे. मात्र या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान आवास योजनेत ८ ते ९ लाखांत घर असल्याचे सांगितले जाते. मग ही घरे ३० लाखांना कशी? मुंबईत राहणाऱ्या गोरगरीब अत्यल्प व्यक्तीचे किमान उत्पन्न १८ हजारही नाही. जे लोक आउटसोर्सिंगने नेमलेली असतात त्यांना तर १३ ते १४ हजार पगार असतो. अशावेळी ना कमी किमतीत घर, ना कमी किमतीत त्यांना कर्जपुरवठा! कित्येक घर बांधून पडून आहेत. त्या घरांचे पुढे काय होते? याचा सरकारने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे.

- शैलेंद्र कांबळे, मुंबई रहिवासी महासंघ

म्हाडाच्या घरांच्या किमती गरिबांच्या निव्वळ चेष्टा करणाऱ्या आहेत. इतक्या मोठ्या किमतीवर बँका कर्ज देत नाहीत. सहकारी बँका ३० लाखांपुढे कर्ज देऊ शकत नाहीत. राष्ट्रीयकृत बँका जे करारपत्र मागतात ते सर्वसामान्य देऊ शकत नाही. सर्वसामान्य कंत्राटी कामगार ज्यांचे उत्पन्न दीड लाखांहूनही कमी आहे, अशांची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. अशा लोकांना म्हाडाच्या घरची अपेक्षा असते. मात्र त्यांच्या अपेक्षाभंग झाल्याचे चित्र आहे.

- विश्वास उटगी, निवारा अभियान मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT