मुंबई: सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे रायगडमधील पर्यटनस्थळांवर नाताळ दरम्यानच मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. त्यातच राज्य सरकारनं महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लावण्याने पर्यटकांचे लोंढे रायगडमधील पर्यटनस्थळावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच बेशिस्त पर्यटकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत आणखी वाढ होणार आहे.
नाताळ निमित्ताने रायगडमधील 70 टक्के हॉटेल्स हाऊसफुल झालेली आहेत. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या रात्रीच्या कर्फ्यूमुळे ऑनलाईन बुकिंगला वेग आला आहे. जवळच्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण - डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड या महानगर पालिकांमधील लाखो पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर येण्याची शक्यता आहे.
या महानगरपालिकांना रायगड जिल्हा सर्वात जवळचे पर्यटन ठिकाण असून ग्रामपंचायत हद्दीतील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. येथील लॉज, कॉटेजेस, हॉटेल्स हाऊसफुल होऊ लागले आहेत. ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात नियमावलीबद्दल निर्णय झालेला नसल्यामुळे पर्यटकांसाठी वेगळी नियमावली तयार करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात आज अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत होणार आहे. जाहीर होणाऱ्या नियमांचे पालन येथील पर्यटन व्यावसायिक, वाहतूक व्यावसायिक यांना सक्तीने करावे लागणार आहे. नाताळ निमित्ताने विक्रमी गर्दी होण्याची शक्यता येथील हॉटेल व्यावसायिक वर्तवत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी तयारी देखील केली आहे. मात्र या सर्वांचा परिणाम येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत होण्याची शक्यता आहे.
नाताळ शुक्रवारी साजरा होत आहे. त्यानंतर सलग सुट्ट्या आल्याने अनेकजण पर्यटनाला बाहेर पडण्याचे नियोजन करत आहेत. अलिबाग, मुरुड, कर्जत येथील फार्महाऊस, हॉटेल्स 70 टक्के बुक झालेले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील रात्रीची संचारबंदी ही रायगडमधील पर्यटक व्यावसायिकांना ही लॉटरीच लागलेली असून दरवर्षी होणाऱ्या गर्दीपेक्षा ही गर्दी जास्त असण्याची शक्यता आहे.
अनलॉकनंतर रायगड जिल्ह्यातला पर्यटन व्यवसाय सुरु झाला. मात्र पर्यटकांसाठी वेगळी अशी नियमावली नव्हती. मास्क, सॅनिटरायझर, सामाजिक अंतर यासारख्याच उपाययोजना केल्या जात होत्या. यांचा विसर पर्यटकांना आणि हॉटेल व्यावसायिकांना पडल्याने येथील नागरिक थेट जिल्हाधिकारी, पोलिस यांच्याकडेच तक्रारी करु लागले आहेत.
अधिक वाचा- आजपासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात, शाळा बंद असल्याने मुख्याध्यापकांमध्ये नाराजी
रात्रीची संचारबंदी महानगरपालिका क्षेत्रासाठी आहे. ग्रामीण भागासाठी राज्य सरकारनं जी एसओपी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर जी नियमावली आहे, ती तशीच आहे. मात्र, या दरम्यान नागरिकांनी कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अदिती तटकरे, पालकमंत्री रायगड
पर्यटकांना मास्क लावणे गरजेचे आहे. यासाठी सबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने पर्यटकांवर सक्ती करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रवासी जलवाहतूक करणाऱ्या नौका, सार्वजनिक वाहने, हॉटेल यासारख्या ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे. निदान या ठिकाणी मास्क लावण्याची सक्ती करणे आवश्यक आहे.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड
-------------------------
(संपादन- पूजा विचारे)
New Year celebration Tourists going raigad District police prepares
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.