फळपीक स्पर्धेत नऊ शेतकऱ्यांना पुरस्कार
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या स्थानिक फळे व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाले आहेत. रायगड जिल्ह्यातून किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत एकूण ३८ शेतकऱ्यांचे विविध फळ आणि भाज्या पिकांचे नमुने मांडण्यात आले होते. यात कर्जत तालुक्यातील जगन पादीर यांचा फणस, दिवेआगर येथील बाळकृष्ण बापट यांचा कोकम, रोहा-तांबडी येथील विनोद पाटील यांचा लाल जाम सर्वात सरस ठरला.
या स्पर्धेत आदिवासी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सर्व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान सोमवार (ता. ७) रोजी विद्यापीठ दापोली येथे कुलगुरू, सर्व संचालक आणि प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे, शिवाय प्रत्येक सहभागी शेतकऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कोकणात फळ आणि भाजीपाला पिकांमध्ये विविधता आहे. औषधी गुणविशेषत: असणारी यातील काही फळे, भाज्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. या पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबवले जातात. त्यातीलच हे स्थानिक फळे व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धा उपक्रम होता. १७ ते १८ मे या कालावधीत विद्यापीठात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनामध्ये कोकणातील ५० हून अधिक फळे आणि भाज्यांच्या ३२५ पेक्षा जास्त जाती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांच्या नमुन्यांची कमिटीने संबंधित फळ आणि भाज्यांमध्ये वैशिष्यांनुसार प्रथम क्रमांक म्हणून निवड केली आहे. यात कर्जत तालुक्यातील जगन पादीर यांचा फणस, दिवेआगर येथील बाळकृष्ण बापट- कोकम, रोहा तालुक्यातील तांबडी येथील नितीन पिंपळे-कमरख आणि बिलिंबी तर विनोद पाटील- लाल जाम, रोहा तालुक्यातील वाघरवाडी येथील गणेश शिद- ठाकरी वांगी, देवकान्हे येथील खेळू थिटे- मिरची, अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील संतोष कवळे- सफेद कांदा, महाड तालुक्यातील वरंध येथील सुभाष देशमुख- लाल पेरू आदी पिकांची निवड करण्यात आली आहे.
----
दुर्लक्षित फळ-भाजी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन मिळावे, म्हणून विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबवले जातात. रायगड जिल्ह्यात विशेषत: आदिवासी शेतकऱ्यांकडे काही दुर्लक्षित फळांच्या जाती आहेत. उदा. लाल जाम, कमरख आणि बिलिंबी या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. मनोज तलाठी, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र- किल्ला, रोहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.