जाधववाडी ते मुळशी मार्गावरील मोरी कोसळली
रस्त्यांची अवस्था दयनिय ः प्रशासनाच्या दुर्लक्षाने ग्रामस्थांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १८ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील जाधववाडी ते मुळशी गावाला जोडणारा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील असलेल्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावरील मोरी कोसळून तेथे मोठे खड्डे तयार झाले आहेत. परिणामी, या मार्गावरुन प्रवासी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
जाधववाडी ते मुळशी रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, शेतकरी आणि कामानिमित्त जाणारे नागरिक प्रवास करतात. येथील खड्डे आणि त्याचबरोबर मोरी कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. तर, याठिकाणी मोठा अपघात घडू शकतो, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होत असल्याने दोनचाकी वाहनांचे संतुलन बिघडून घसरण्याच्या घटना घडत आहेत. तर, चारचाकी वाहनांना मोठ्या खड्ड्यांतून मार्ग काढताना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
प्रशासनाकडून केवळ आश्वासने
कळंब ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या या रस्त्याची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. याबाबत ग्रामस्थांकडून वारंवार बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले, मात्र अद्यापही कोणतही कार्यवाही झालेली नाही. जिल्हा परिषद प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात मात्र दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आंदोलनाचा इशारा
संबंधित विभागाने तात्काळ रस्ता व मोरीची दुरुस्ती केली नाही तर लवकरच मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे अपघात होऊन काही दुर्घटना झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे म्हणत ग्रामस्थांनी इशारा दिली आहे.
फोटो ओळ,
पाली ः जाधववाडी ते मुळशी मार्गावरील मोरी कोसळून पडलेला खड्डा. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, जाधववाडी ते मुळशी रस्त्याची झालेली दुरवस्था . (छायाचित्र, अमित गवळे)