मुंबई : राज्यातील शाळा सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटत असताना दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नवीन पाठ्यपुस्तकांतील वाह्यांच्या कोऱ्या पानांची पाकिटे, पुड्या बनवून ती बाजारात औषध-गोळ्या आणि इतर वस्तू देण्यासाठी वापरली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नवीन रचनेची पुस्तके उपलब्ध करून दिली असून यामध्ये प्रत्येक पुस्तकाला वह्यांची पाने जोडली गेली आहेत.
त्याच पुस्तकातील काही वह्यांची पाने आता बाजारात रद्दी म्हणून वापरली जात असल्याची बाब समोर आली आहे.
औरंगाबाद येथील सिडको परिसरात असलेल्या बजरंग चौकातील एका औषध विक्रेत्याकडे चक्क पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानांनी तयार करण्यात आलेल्या पाकिटात औषध-गोळ्या देण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकाराबाबत शिक्षक आणि तज्ज्ञांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आजमितीला सरकारी शाळातील १ कोटी ७ लाख ४७ हजार ७२८ विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी ३७ लाख २१ हजार ९५१ पुस्तके उपलब्ध करून देण्यात असली, तरी अजूनही ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना अजूनही ही पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे समोर आले आहे.
अनेक जण पुस्तकांपासून वंचित असताना याच पुस्तकांची पाने औषध-गोळ्यांसाठी वापरली जात असतील तर ही गंभीर बाब असून याविषयी शालेय शिक्षण विभागाने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर आणि यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणीही आता केली जात आहे.
दुसरी ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्यात आल्याने या पुस्तकांचे वजन वाढले आहे. मुळातच या पुस्तकांची निर्मिती करताना ती गुणयुक्त झाली नाही. पुस्तकांची पाने सुटी होतात, त्यामुळे ती विद्यार्थ्यांना जपून ठेवणे कठीण होते आहे. त्यामुळे पाने सांभाळायची की पुस्तके, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण होतो.
यामुळे या पुस्तकांची एकूणच बांधणी करताना त्याचा कोणताही दर्जा आणि गुणवत्ता सांभाळली गेली नाही असे दिसते. हे सर्व परिणाम अगदी अल्प वेळेतच समोर आले आहेत. याविषयी शिक्षण विभागाने आता तरी गांभीर्याने हा विषय लक्षात घ्यायला हवा.
- भाऊ गांवडे, माजी शिक्षण संचालक
वह्यांची पाने आणि वास्तव
- पहिली ते आठवीतील पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात आली, त्यामध्ये वहीची पाने समाविष्ट करण्यात आली आहेत.
- कमी वेळेत पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याचा कार्यक्रम करण्यात आल्याने त्यासंदर्भातील पुस्तकांची दर्जाहीन बांधणी झाली.
- पुस्तकांतून वह्यांची पाने निखळून पडत असल्याने ती सांभाळणे विद्यार्थ्यांना कठीण होत असल्याने अनेक ठिकाणी ही पाने रद्दीत जात आहेत.
- तज्ज्ञांची मते विचारात न घेताच पुस्तकांची पाने जोडण्यात आली; मात्र त्याच्या रचनेवर लक्ष दिले गेले नाही.
- वह्यांच्या पानांपेक्षा स्वाध्याय पुस्तिका प्रभावी ठरली असती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शालेय पाठ्यपुस्तकाच्या बांधणी आणि छपाई संदर्भात कोणत्याही त्रुटी आढळून आल्यास ती पुस्तके बदलून देण्याचे निर्देश वेळोवेळी बालभारती कडून दिले जातात. शाळास्तरावर अशी पुस्तके आढळल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा मुख्याध्यापक यांच्याकडे ती पुस्तके जमा करावीत. खाजगी दुकानातून खरेदी केल्यास ती दुकानाकडे जमा करून दिल्यास त्यासाठीची नवीन पुस्तके बदलून मिळतील. मात्र पुस्तकाच्या पानाचा गैरवापर केला तर त्यावर निश्चितच कारवाई होऊ शकते.
- कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष, बालभारती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.