पावसाळ्यातही डिहायड्रेशनचा त्रास
पुरेसे पाणी न पायल्याने अवयवांच्या कार्यावर दुष्परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पावसाळा सुरू होताच उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळतो. पण जसजसे हवामान बदलते तसतशी तहान कमी होऊ लागते. पावसाळ्यात हवामानात आर्द्रता जास्त असल्यामुळे शरीरातून भरपूर प्रमाणात घाम येतो आणि पाण्याची कमतरता निर्माण होते. याच काळात पाण्याचे सेवन कमी होते. कारण या दिवसांत तहान फार कमी लागते. ही सवय धोकादायक ठरू शकते. सध्या लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांत निर्जलीकरणाची (डिहायड्रेशन) समस्या आढळून येत आहे.
मुंबईतील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. निमित नागदा यांनी सांगितले, की पावसाळ्यात केवळ अतिसार, बद्धकोष्ठताच नाही तर डिहायड्रेशनहीदेखील एक सामान्य घटना आहे. जेव्हा तुमचे शरीर जेवढ्या द्रवपदार्थाचे सेवन करते त्यापेक्षा जास्त द्रवपदार्थ गमावते तेव्हा डिहायड्रेशनची समस्या होते. याचा तुमच्या अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. मूत्रपिंडांवर ताण येणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, उष्माघात आणि वेळीच उपचार न केल्यास रुग्णालयात दाखल होणे, यासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. कमी तापमानामुळे पावसाळ्यात लोकांना तहान कमी लागते, पण याचा अर्थ असा नाही की शरीराला पाण्याची गरज नाही. पावसाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन खूप सामान्य असतात. त्यामुळे अतिसार आणि उलट्या होऊन द्रव आणि इलेक्ट्रोलाइट जलदरीत्या कमी होतात, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. कामाच्या वेळी किंवा प्रवासादरम्यान पुरेसे पाणी न प्यायल्याने जास्त घाम आल्यानेदेखील डिहायड्रेशनची समस्या सतावत आहे.
१० पैकी सात जणांना समस्या
ओपीडीत उपचारासाठी येणाऱ्या २५ ते ५५ वयोगटातील १० पैकी सात व्यक्तींमध्ये तोंड आणि ओठ कोरडे पडणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी किंवा लघवी कमी होणे, चक्कर येणे किंवा डोकेदुखी आणि स्नायूंमधील वेदना अशा तक्रारी आढळल्या आहेत. डिहायड्रेशनच्या उपचारात शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणात राहील यासाठी ओआरएसचे सेवन करणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये आयव्ही फ्लुइड्सद्वारे उपचार केले जातात. प्रत्येकाने डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याची आणि हायड्रेटेड राहण्याची खात्री करा, असेही ते म्हणाले.
डिहायड्रेशन कसे ओळखावे?
मुंबईतील खासगी रुग्णालयाच्या रिजनल टेक्निकल चीफ डॉ. उपासना गर्ग म्हणाल्या, की जर डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर रुग्णाला साध्या रक्त चाचण्या (जसे की सीरम इलेक्ट्रोलाइट्स, युरिया आणि क्रिएटिनिन) तसेच लघवीचे विश्लेषण करण्याचा सल्ला दिला जातो. डिहायड्रेशनचे वेळीच निदान आणि उपचार गंभीर गुंतागुंत टाळू शकतात. डिहायड्रेशनमुळे थकवा, मूत्रपिंडावर ताण वाढणे, रक्तदाब कमी होणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि गंभीर प्रकरणांत रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वाढू शकते. पावसाळ्यातही लोकांनी ठरावीक अंतराने पाणी प्यावे. विशेषतः जर ते संसर्गातून बरे होत असतील किंवा कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागत असेल. हायड्रेटेड राहणे ही केवळ उन्हाळ्यातच गरजेचे नाही तर ही वर्षभराची म्हणजेच सर्वच ऋतूंमध्ये गरजेचे आहे.
पेशी संकुचित
आपले शरीर ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा डिहायड्रेशनमुळे पेशी संकुचित होतात आणि योग्यरीत्या कार्य करू शकत नाहीत. पेशींना त्यांचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी भरपूर पाणी लागते. प्रत्येक ऋतूमध्ये व्यक्तीने स्वतःला हायड्रेट ठेवले पाहिजे.
पित्ताचा त्रास असेल तर शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज आठ ग्लास पाणी प्यावे आवश्यक आहे. शिवाय जर तुम्हाला कफ असेल तर तुम्ही नैसर्गिकरीत्या पाणी शोषून घेता. वाताचा त्रास असलेल्या लोकांनी दररोज तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यावे. पाणी वात काढून टाकते. हे पित्त दोष संतुलित करते आणि कफ वाढण्यास प्रतिबंध करते. स्वतःला हायड्रेट ठेवल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. पुरेशा प्रमाणात पाणी घेतल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. काही पेये जे दिवसभर हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहण्यासाठी पिऊ शकतात ते म्हणजे नारळाचे पाणी, ओतलेले पाणी, स्मुदी, ओआरएस, ताक यासारखे पदार्थ ऊर्जा कायम राखण्यास मदत करतात.
- डॉ. मधुकर गायकवाड, मेडिसीन विभाग, युनिट प्रमुख, जेजे रुग्णालय