शंभर वर्षांचा तरुण गांधीवादी!
डॉ. जी. जी. पारीख यांच्या जागवल्या आठवणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः ‘डॉ. जी. जी. पारीख हे १०१ वर्षांचे होते तरी त्यांचा आत्मा २० वर्षांच्या उत्साही युवकाचा होता. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा तेव्हा मनात थोडीशी भीती असायची. कारण प्रत्येक भेटीत ते म्हणायचे, तुषारभाई, आता तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. ते पुढे सांगायचे, लोकशाही बळकट करायची असेल, तर तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. या वयातही ते दररोज ईमेल करून पुढे काय करायचे आहे याचे नियोजन मला पाठवत. आता माझा इनबॉक्स सुना-सुना झाला,’ असे सांगत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी डॉ. पारीख यांच्या आठवणी सांगताना भावुक झाले, तर मी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर, मुंबईतील माझ्या राहण्याच्या व्यवस्थेची त्यांनी आवर्जून आठवण केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.
ज्येष्ठ गांधीवादी आणि समाजवादी विचारवंत डॉ. जी. जी. पारीख यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी मेधा पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सुधींद्र कुलकर्णी, भालचंद्र मुणगेकर आणि समाजवादी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ‘जी. जी. हे अनेकांच्या आयुष्यात खूप काही होते; पण माझ्यासाठी ते प्रेमळ पप्पा होते,’ असे त्यांची एकुलती एक कन्या सोनल शहा म्हणाल्या. ‘आयुष्यभर त्यांनी माझ्यावर आणि आईवर निस्सीम प्रेम केले. पप्पा मला गणित आणि विज्ञान शिकवायचे. त्यांनी मला वाचनाची सवय लावली. दररोज सकाळी आम्ही एकत्र तासभर टॉलस्टॉय, टागोर आणि जागतिक साहित्य वाचत असू,’ असे त्या म्हणाल्या. आमचे घर हे एका समाजवादी, गांधीवादी माणसाचे घर होते. त्याचे दरवाजे सर्वांसाठी सदैव खुले असायचे, असेही त्यांनी सांगितले.
...
मला अटक करा!
तुषार गांधी यांनी एक किस्सा सांगितला, ‘दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट क्रांती मैदानात जाण्यापासून मला आणि जीजींना मुंबई पोलिसांनी रोखले होते. मला पोलिस ठाण्यामध्ये नेले, तर जीजींना गाडीतच थांबवण्यात आले. माहिती मिळताच मी कार्यकर्त्यांना सांगितले, तत्काळ जीजींना घरी पाठवा! कारण मला भीती होती की ते गाडीतून उतरतील आणि पोलिसांना म्हणतील ‘मला अटक करा!’
...
गांधींच्या विचारांनी काम करण्याचा त्यांचा एक व्यापक दृष्टिकोन होता. जीजींसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. मी भाग्यवंत आहे.
- सुधींद्र कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते
...
आज जगात कुठल्याही प्रकारचा समाजवाद अस्तित्वात नाही. तरीही डॉ. पारीख शेवटपर्यंत लोकशाही आणि समाजवादी विचारांवर ठाम राहिले.
- भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार, काँग्रेस
...
महात्मा गांधी यांच्यासारखा हाडामासाचा माणूस होऊन गेला यावर नव्या पिढीला विश्वास बसणार नाही, असे अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एकदा म्हटले होते. जी.जी. त्याच तोलामोलाचे व्यक्तिमत्त्व होते.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
...
जीजी यांच्याकडून मी खूप काही शिकले. माझ्या प्रत्येक आंदोलनात ते पुढे असायचे. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा नारा जीजींचा होता.
- मेधा पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.