कल्याण रिंग रोडच्या आरेखनात बदल
प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल; एमएमआरडीएची बैठक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा शहरांना जोडण्यासाठी आणि प्रवास गतिमान व सहज व्हावा, यासाठी कल्याण रिंगरोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. रिंग रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी भूसंपादन लवकरात लवकर होणे गरजेचे आहे; मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे त्याच्या आरेखनात बदल करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे.
कल्याण रिंग रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एमएमआरडीएची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या. शिळ रस्ता ते मोठागावपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी भूसंपादन करावे लागणार होते. त्यामुळे या प्रक्रियेत वेळ जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आरेखनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील टप्प्यांतील अतिक्रमणे हटवून रस्त्याला गती देण्याचीही सूचना डॉ. शिंदे यांनी केली आहे.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण रिंग रोड प्रकल्प उभारला जात आहे. यातील एकूण आठ टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे (दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टप्पेही जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली सुरू आहेत. असे असतानाचा आता या प्रकल्पातील टप्पा दोन (शिळ रोड ते मोठागाव ब्रिज) या मार्गाच्या आरेखनात बदल करण्यात येत आहे. या नियोजित मार्गाच्या उभारणीसाठी भूसंपादन करावे लागत असल्याने अनेक अडचणी येत आहे. यातील विलंब टाळण्यासाठी या टप्प्याची खाडीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या निधीचीही गरज लागणार नाही. तसेच या प्रक्रियेत वेळही वाचणार आहे. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनीही या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे.
काम ९५ टक्के पूर्ण
डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येत आहे. यातील टप्पा चार (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा पाच (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा सहा (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा सात (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. यातील बहुतांश रस्ता सध्या वापरला जातो आहे.
काटई-टिटवाळा २० मिनिटांवर
टप्पा तीन (मोठा गाव ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून येत्या काही महिन्यात याचे काम पूर्णत्वास जाणार आहे. तर यातील टप्पा एक हेदुटणे ते शिळ रोड या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन सुरू आहे. तर टप्पा दोन शिळ रोड ते मोठागाव ब्रिज या नियोजित मार्गात भूसंपादनात अनेक अडथळे असल्याने या मार्गाच्या उभारणीस विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याच पार्श्वभूमीवर टप्पा दोनचे आरेखन नव्याने करण्यात येणार आहे. या मार्गामुळे काटई-टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. तर अवजड वाहनांची वाहतूकदेखील या मार्गावरून होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.