पीक विमा योजनेस शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद;
थकीत भरपाई आणि आधार लिंक समस्यांमुळे उदासीनता
अलिबाग, ता. २७ (प्रतिनिधी) ः नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली आहे, मात्र रायगड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ साठी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ३१ जुलै ही नोंदणीची अंतिम तारीख असताना आतापर्यंत केवळ २, ७३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
या योजनेंतर्गत भात व नाचणी पिकासाठी अनुक्रमे ६१ हजार व ३५ हजार रुपये संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. भातपिकासाठी एक एकर क्षेत्रासाठी १८३ रुपये, तर नाचणीसाठी ३५ रुपये इतका हप्ता आकारला जातो. तथापि शेतकऱ्यांच्या नोंदणीला गती न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. गेल्या वर्षी एक रुपयावर नोंदणी करूनही हजारो शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाई मिळालेली नाही. २०२४ मध्ये नोंदणीकृत १,१७२ शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांमध्ये निराशा व उदासीनता दिसून येते, याशिवाय अनेक शेतकऱ्यांची बँक खाती आधार क्रमांकाशी लिंक नसल्याने विमा रक्कम जमा करण्यात अडथळे येत आहेत. आधार लिंकसाठी बँक किंवा सेतू कार्यालयात जावे लागते. त्यामुळे वेळ व खर्च यामुळेही शेतकरी नोंदणीपासून दूर राहतात.
...............
चौकट
जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले की, काही तांत्रिक अडचणी असूनही विमा रक्कम देण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. तालुकानिहाय नोंदणी पाहता पेण (१३७९), कर्जत (२६३), महाड (२५२) या तालुक्यांमध्ये प्रतिसाद दिसून येतो, तर उरण (११), श्रीवर्धन (१५) या भागात मात्र फारच कमी नोंदणी झाली आहे.
शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.