भाषिक वारशाचे विद्यापीठात जतन
पाली, प्राकृत भाषा अभ्यासासोबत अवेस्ता-पहलवीचे होणार संशोधन
मुंबई, ता. ११ :
मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होत असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टिकल्चरल स्टडीज’च्या स्थापनेसाठी ४९.९५ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अल्पसंख्याक विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून मुंबई विद्यापीठात या केंद्राच्या स्थापनेसाठी मान्यता मिळाली आहे. या माध्यमातून मुंबई विद्यापीठात भाषिक वारशाचे जतन करण्यात येणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून भारतातील समृद्ध भाषिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले जाणार आहे. विद्यापीठात स्थापन होत असलेल्या या केंद्रात प्रामुख्याने ‘अवेस्ता-पहलवी’, ‘पाली’ आणि ‘प्राकृत’ या प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान भाषांवर भर दिला जाणार आहे.
या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या उद्दिष्टांशी सुसंगत या केंद्राच्या स्थापनेमुळे विविध क्षेत्रांतील अभ्यासकांना संशोधनाची नवी दालने खुली होतील. तसेच वारसागत भाषांचे जतन आणि पुनरुज्जीवन हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उद्देश साकार होईल. हे केंद्र ‘युगे युगेन भारत’, ‘ज्ञान भारतम्’ आणि ‘भारतीय भाषा संवर्धन योजना’ यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी समन्वय साधून कार्य करणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.
या भाषांतील साहित्य, बहुमूल्य ग्रंथ, हस्तलिखिते आणि शिलालेखांचे संशोधन व जतन या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. तसेच अवेस्ता-पहलवी, पाली व प्राकृत यासारख्या अल्पज्ञात, दुर्मिळ व लुप्तप्राय भाषांना अभ्यासाचा केंद्रबिंदू बनवून, या केंद्राच्या माध्यमातून त्या भाषांचे दस्तऐवजीकरण, अभ्यास, संशोधन व सामाजिक जागरूकता वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. या केंद्राच्या इमारतीसाठी आवश्यक जागेची कलिना संकुलात निवड करण्यात आली असून, लवकरच या केंद्राचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
असे असतील उपक्रम
- लोप पावत असलेल्या व अल्पसंख्याक समुदायांमधील भाषांचे मौखिक आणि लिखित स्वरूपातील दस्तऐवजीकरण
- लोकसाहित्य, लोककला, लोकगीते, परंपरा आणि संस्कृती यांचे संशोधन, डिजिटायझेशन आणि संग्रह
- वारसागत भाषा व संस्कृती अभ्यासासाठी अभ्यासक्रम विकास, प्रशिक्षण कार्यशाळा, व संशोधन प्रकल्प
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांशी सहकार्य साधून विविध शैक्षणिक उपक्रम
- विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, युवा संशोधकांसाठी प्रोत्साहनपर योजना, व समाजाभिमुख कार्यक्रम
भारताच्या विविधतेने नटलेल्या भाषिक व सांस्कृतिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन करून शाश्वतेच्या दृष्टीने विचार व्हावा, यासाठी मुंबई विद्यापीठात हे केंद्र स्थापन केले जात आहे. हे केंद्र भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रभावी माध्यम ठरेल.
-डॉ. रवींद्र कुलकर्णी,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.