समाजमाध्यमांवर मनसेची टीकेची ‘हंडी’
राजू पाटील यांच्या पोस्टला सरनाईकांचे भावनिक उत्तर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने ठाण्यात १० थर रचून विश्वविक्रम केला असला तरी जय जवान पथकानेही तीनवेळा १० थर रचून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे, मात्र या विश्वविक्रमाच्या कौतुकावरून राजकारणही तापले असून, मनसेच्या राजू पाटील यांनी संस्कृती प्रतिष्ठानवर समाजमाध्यमावर पोस्ट लिहून ‘संस्कृती आणि संस्कार वागण्यात असले पाहिजे, नुसत्या नावात काय आहे, अशी टीका केली आहे. याला आयोजक पूर्वेश सरनाईक यांनीही समाजमाध्यमावर ‘जय जवान पथक आमच्या हृदयात आहे’, अशी भावनीक पोस्ट टाकत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाण्यात १० थरांचा विश्वविक्रम झाल्याच्या आनंदापेक्षा त्यामागील राजकारणाची चर्चा रंगली आहे. त्यात मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी समाजमाध्यामावर पोस्ट लिहून संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीवर टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात जय जवान पथकाने सलामी दिल्यामुळे त्यांना प्रो गोविंदामधून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे, पण तरीही या पथकाने एकाच दिवशी तीन वेळा १० थर रचल्याचा विक्रम केला असल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे.
राजू पाटील यांच्या या पोस्टची चर्चा दिवसभर सुरू असताना संस्कृती युवा प्रतिष्ठानचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनीही भावनिक पोस्ट लिहीत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आपले आणि जय जवान पथकाचे नाते कधीही तुटणार नाही. ‘तुम्ही घडवलेला १० थरांचा ऐतिहासिक मानवी मनोरा केवळ यश नाही, तर प्रत्येकाच्या हृदयात अभिमान भरून गेला.’ असेही यामध्ये लिहिण्यात आले आहे. दरम्यान, प्रो गोविंदा स्पर्धेतून जय जवान पथकाला का वगळण्यात आले याचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.