कामोठ्यातील खड्ड्यांमधून आता धुरळा!
पावसाच्या उघडिपीमुळे रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य
मुख्य रोडवरील दोन्ही बाजूंचे रहिवासी त्रस्त
पनवेल, ता. ९ (बातमीदार) ः कामोठे वसाहतीतील रस्त्यांची विशेषकरून मुख्य रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामधील खडी, रेती आणि माती वर आली आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे आता या रस्त्यांवर धुरळा उडत आहे. त्याचा दुचाकीस्वार आणि दोन्ही बाजूने राहणाऱ्या रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात कामोठेकरांकडून तीव्र नाराजीचा सूर आळवला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी कामोठे वसाहतीमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले; परंतु त्याचा दर्जा चांगला असल्याने पहिल्या पावसातच डांबर वाहून गेले. त्यामुळे त्यामधील खडी, रेती वरती निघाली. ठिकठिकाणी खड्डे पडले. मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रोडची चाळण झालेली आहे. कामोठे पोलिस ठाणे ते मानसरोवर कॉम्प्लेक्सदरम्यान डांबरी रस्ताच राहिलेला नाही. त्यावर खडी विखुरलेली आहे. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार या ठिकाणी घसरून पडत आहेत. लहान-मोठे अपघात रोज घडत आहेत. यामुळे काही जण जखमीसुद्धा झालेले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहने जोरात आढळतात. यामुळे स्पेअर पार्ट खराब होत आहेत. त्याचबरोबर मणक्यालासुद्धा दणके बसत आहेत. यासंदर्भात कामोठे कॉलनी फोरमने कागदी होड्या सोडून आंदोलन केले होते. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी एकता सामाजिक संस्था, फोरम, शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून या ठिकाणची खडी बाजूला सारून गांधीगिरी करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून वाहने जात असताना धूळ उडत आहे. कामोठेकरांना अप्रत्यक्षरीत्या धुळवड सप्टेंबर महिन्यात साजरी करावी लागत आहे. दुचाकीस्वारांच्या नाक, तोंड आणि डोळ्यात धूळ जात आहे. त्याचबरोबर कपडेसुद्धा धुळीने माखले जातात. या मुख्य रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या इमारतीच्या खिडक्या उघडल्यानंतर आतमध्ये धूळ येत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केलेल्या आहेत. महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केले आहे.
.................
खड्डे आणि धुळीचे दुहेरी साम्राज्य!
कामोठे येथील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. पूर्णपणे डांबर निघून गेले आहे. या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे. त्यातच आता ऊन पडल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या वसाहतीत आता दुहेरी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याला पूर्णपणे संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याची प्रतिक्रिया कामोठे कॉलनी फोरमच्या महिला अध्यक्षा जयश्री झा यांनी दिली.
...............
कामोठे वसाहत म्हणजे बडा घर पोकळ वासा. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजणारी वसाहत समस्यांच्या चक्रव्यूहात आहे. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. आम्ही यासंदर्भात पत्रव्यवहार करून आंदोलनसुद्धा केले. प्रशासनाचे लक्ष वेधले, मात्र खड्ड्यांबरोबरच आता धुळीचाही त्रास वाहनचालक, दुकानदार आणि रहिवाशांना सहन करावा लागत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आपण गप्पा मारतो, पण बाजूला काय स्थिती आहे याचे अवलोकन स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाने करावा इतकीच अपेक्षा.
- मंगेश अढाव, अध्यक्ष, कामोठे कॉलनी फोरम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.