पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
दहा महिन्यांपासून भिवंडीतील शांतीनगर ठाण्यातील पोलिस शहरातील रिक्षाचालकाच्या मुलीच्या हत्याराचा तपास करीत फिरत होते. त्याचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते; पण आरोपी देशातील विविध राज्यांत नाव बदलून, तर कधी सिम कार्ड बदलून पोलिसांना चकवा देत फिरत होता. पोलिसही आधुनिक यंत्रणांच्या आधारे त्याचा मागोवा घेत तपास करीत होती. मात्र, पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यात अपयश येत होते. तरी देखील पोलिसांनी एकतर्फी प्रेमातून निष्पाप मुलीच्या हत्याऱ्यास पकडण्यासाठी शर्थ करीत होते.
भिवंडीत सध्या यंत्रमागावर कापड बनविणे, गोदामात काम करणे आणि प्लॅस्टिकपासून मोती बनविणे हा मोठा रोजगार आहे. यासाठी देशातील विविध भागांतून कामगार आणि व्यावसायिक येत असतात. त्यातच काही वर्षांपूर्वी रोजगारासाठी आलेला भान सिंग परिवारासह भिवंडीतील भादवड गावात स्थायिक झाला होता. शहरातील कापड व्यावसायातील मंदीमुळे तो रिक्षा चालवून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. त्यांच्या शेजारी काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील राजू सिंग (२२) हा रोजगारासाठी आलेला तरुण एकटा राहू लागला. उत्तर प्रदेशमध्ये भादोही जिल्ह्यातील नेवादा गावामध्येही तो शेजारी होता. त्यामुळे राजूचे परिवार संबंध जुळले. भान सिंगला दोन मुली होत्या. त्यातील मोठी मुलगी नेतु (२१) हिला त्याने मागणी घातली. मात्र, भान सिंग याने नकार देत दुसऱ्या ठिकाणी तिचे लग्न जुळविले. याबाबत गावीही दोन्ही परिवारांत बोलणी झाली होती. परंतु भान सिंग निर्णयावर ठाम होते. त्यांच्या याच निर्णयाचा राग आल्याने राजूने काही दिवस भादवड गावात न राहता भिवंडीबाहेरून परिवाराची चौकशी करीत राहिला. त्यांच्या घराजवळ पिठाची चक्की आहे. त्या चक्कीवाल्यास राजू नेहमी फोन करून माहिती मिळवत होता. चक्कीवाल्याला या संदर्भात काही माहिती नसल्याने तो बिनदिक्कत सर्व माहिती देऊ लागला.
त्यानंतर त्याने मुंबईतील वीरेंद्रकुमार श्रीराम दुबे या कारचालकाला भिवंडीत आणून रेकी केली. २८ ऑक्टोबर सकाळी ११.३० वाजता तो भान सिंग यांच्या घरात शिरला. दरवाजा आतून बंद करीत नेतुशी त्याने भांडण केले. एवढ्यावरच न थांबता चाकूने त्याने अनेक वार केले. त्याच वेळी नेतुची बहीण शिकवणीहून घरी आली होती. आतून येणाऱ्या आवाजाने ती दरवाजा उघडण्यासाठी बहिणीला आवाज देत होती. घरातून रक्ताने माखलेल्या कपड्याने राजू बाहेर निघत कारमधून फरार झाला. परिसरातील नागरिकांनी भान सिंग यांना कळवून नेतुला तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, तिचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत राजूविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यात पोलिसांनी चक्कीवाला शिवम राजेश सिंग (२२) व कारचालक वीरेंद्रकुमार दुबे यांना अटक करून गुन्ह्याची माहिती घेतली आणि राजूचा तपास सुरू केला.
राजूच्या भावाचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असल्याने काही दिवस त्याच्यासोबत फिरत असल्याने एकच ठिकाण मिळत नव्हते. त्यानंतर त्याने भावाला सोडून वेगवेगळे सिम वापरून वेगवेगळ्या राज्यात १० महिने फिरत पोलिसांना गुंगारा देत राहिला. २ सप्टेंबरला तो मध्य प्रदेश देवास नाका, इंदौर येथे असल्याचे समजले. भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी इंदौरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधून राजूचा फोटो पाठविला. इंदौरच्या पोलिसांनीही थेट राजूला गाठले; मात्र त्याने स्वत:चे नाव सूरज असल्याचे सांगितले. त्याच वेळी भिवंडी पोलिसांनी त्याच्या हातावर टॅटू काढल्याची निशाणी सांगितली. पोलिसांनी हातावरील टॅटू पाहताच अटक केली.
इंदौरच्या पोलिसांनी त्याला भिवंडीच्या पोलिस पथकाच्या स्वाधीन केले. या कारवाईत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक आयुक्त सचिन सांगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक अतुल आडुकर आणि विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे, हवालदार रिजवान सय्यद, राजेश पाटील, नीलेश महाले, नाईक राहुल वझरे, शिपाई प्रशांत बर्वे, रोशन जाधव, संजय चव्हाण, भूषण पाटील, नीलेश पाटील यांचा सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.