...तर एकही विमान उडू देणार नाही!
दि. बा. पाटील अभिवादन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
भिवंडी/उरण, ता. १४ (वार्ताहर) : ‘राज्य सरकारने एकमताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे, मात्र जोपर्यंत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत या विमानतळाहून एकही विमान उडू दिले जाणार नाही,’ असे प्रतिपादन खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी जासई येथे रविवारी केले.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र आगरी कोळी समाज सुरुवातीपासून आग्रही आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकाराने केंद्राकडे पाठवला आहे; मात्र याबाबत अजूनही चालढकल केली जात असल्यामुळे विमानतळ उद्घाटनापूर्वीच याबाबतचा निर्णय घावा, यासाठी खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी ते जासई या दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापर्यंत रविवारी (ता. १४) अभिवादनपर भव्य कार रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी जासई येथील सभागृहामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार म्हात्रे म्हणाले, ‘आम्हाला खात्री आहे की या आंदोलनाची दखल केंद्र सरकारकडून तत्काळ घेतली जाईल आणि नामकरण करण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. यामध्ये केंद्र सरकारने काही काळेबेरे केल्यास हा लढा अधिक तीव्र करून नवी मुंबई विमानतळाचा उद्घाटन सोहळा होऊ देणार नाही,’ असा इशाराही खासदार म्हात्रे यांनी दिला. या सभेला खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, मनसेचे राजू पाटील, ९५ गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, अतुल पाटील, शेकाप नेते राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर, कॉम्रेड भूषण पाटील आदी उपस्थित होते.
वंचितचा पाठिंबा
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहराच्या वतीने अध्यक्ष प्रदीप शिर्के यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करणारे पत्र खासदार सुरेश म्हात्रे यांना दिले. या रॅलीत अनेक संस्था, विविध संघटनांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनास अनेक राजकीय पक्षांतील भूमिपुत्र समाजबांधव आपली राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून सहभागी झाले होते.
पारंपरिक पद्धतीने स्वागत
मानकोली मोठा गाव डोंबिवली येथे दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रॅलीस सुरुवात करण्यात आली. या वेळी मानकोली, खारेगाव, कळवा, विटावा या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांनी जल्लोषात पारंपरिक वेषभूषेसह कोळी बांधवांनी या रॅलीने स्वागत केले. ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विश्वास थळे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. रूपाली कराळे, माजी जिल्हा परिषद सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांसह मोठ्या संख्येने भिवंडी तालुक्यातील बहुजन समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.