उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : बेपत्ता मुलींच्या शोधात पोलिसांची निष्क्रियता, अपहरण प्रकरणांत मूळ गुन्हेगारांपर्यंत न पोहोचलेली तपास यंत्रणा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे उल्हासनगर व कल्याणमधील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘कायद्याने वागा लोकचळवळ’ आणि ‘कल्याण विकासिनी’ या संस्थांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत १६ सप्टेंबर रोजी ठाणे पोलिस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनानंतरही पोलिसांनी ठोस पावले उचलली नाहीत, तर बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांत ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक मुली बेपत्ता झाल्याच्या घटना चर्चेत आहेत. यामध्ये कल्याणातून राजस्थानात पळवून नेलेली रिक्षाचालकाची मुलगी, उत्तर प्रदेशमधून कल्याणात आलेल्या मुलींपैकी झालेले अपहरण; तसेच इतर अल्पवयीन मुलींच्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांत मुलींचा शोध घेण्याऐवजी काही पोलिस ठाण्यांनी ‘हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही’ असा पवित्रा घेतल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे, तर काही गंभीर प्रकरणांत आरोपींना सोडून दिल्याचे संघटनांनी दावा केला आहे.
कल्याण विकासिनीचे अध्यक्ष ॲड. उदय रसाळ आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रमुख राज असरोंडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘बेपत्ता मुलामुलींच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात निष्क्रियता दिसून येते. काही ठिकाणी आरोपींना सोडून दिले जाते, तर काही ठिकाणी मुलींचा शोध घेण्याची इच्छाशक्तीच नाही’. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या धरणे आंदोलनानंतर पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिक व सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.