उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने मोठा राजकीय डाव खेळला आहे. भरत गंगोत्री यांना पुन्हा एकदा शहराध्यक्षपदी नियुक्त करत संघटनेला बळ देत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. कलानी गटाशी संभाव्य समीकरणांवर पडदा टाकत राकांपाने ‘गंगोत्री फॉर्म्युला’वर विश्वास दाखवला आहे. आता गंगोत्रींच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणुकीत नेमकी कोणती रणनीती आखणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भरत गंगोत्री यांची नियुक्ती आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात गंगोत्री यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून एका वर्षापासून हा पदभार रिक्त होता. या दरम्यान राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली होती की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा महत्त्वाचा पदभार कलानी गटाला दिला जाऊ शकतो. मात्र, कलानी गटाने शिवसेनेसोबत दोस्तीचे गठबंधन करून घेतल्याने हे प्रयत्न फोल ठरले. आता भरत गंगोत्री यांची पुनर्नियुक्ती होताच या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसाठी सज्ज आहोत. लवकरच शहर कार्यकारिणीची बैठक घेऊन पुढील रणनीती जाहीर करण्यात येईल, असे गंगोत्री म्हणाले.