मुंबई

कचऱ्यासाठी ३० कोटींचा सल्ला

CD

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून नवीन घनकचरा प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून केला जाणार आहे.

मिरा-भाईंदरमध्ये दररोज सुमारे ४५० टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. काही कचऱ्यावर बायोगॅस प्रकल्पातही प्रक्रिया केली जाते. सध्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्प सौराष्ट्र एन्वायरो प्रोजेक्ट या कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवला जातो व त्याची मुदत पुढील वर्षी संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची यंत्रणा आता कालबाह्य झाली आहे. प्रकल्पातील प्रक्रिया पद्धतीत पुरेशा शास्त्रोक्त व वैज्ञानिक पद्धतीचा अभाव आहे. त्यात कचरा वर्गीकरण, खतनिर्मिती, पुनर्वापर, कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती यासाठी कोणतीही एकात्मिक सुविधा उपलब्ध नाही. दुसरीकडे शहरात दररोज निर्माण होत असलेल्या घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाही महापालिकेकडे नाही.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सेंद्रिय कचऱ्यापासून बायो व सीएनजी गॅसनिर्मिती आदी घनकचरा प्रकल्प राबविणे अपेक्षित आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेला उत्तन येथे ३१ हेक्टर सरकारी जागा मिळाली आहे, मात्र त्याचाही पूर्णपणे वापर झालेला नाही. त्यामुळे या जागेचे नियोजनही करणे आवश्यक झाले आहे. या सर्वांचा विचार करून नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी महापालिकेने मान्यताप्राप्त प्रकल्प सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यासाठी तब्बल ३० कोटी खर्च करावे लागणार आहेत.

आयुक्तांकडून मान्यता
महापालिकेला राज्य सरकारकडून मूलभूत सोयीसुविधा विशेष अनुदान मिळाले आहे. त्यात या प्रकल्पाच्या खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यातूनच प्रकल्प सल्लागाराचे शुल्क दिले जाणार आहे. हा प्रकल्प सल्लागार, प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करणे, प्रकल्प सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) प्रकल्पासह पायाभूत सुविधा प्रकल्प तयार करणे, त्याचबरोबर प्रकल्पावर दैनंदिन देखभाल करणे आदी जबाबदारी पार पाडणार आहे. आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी प्रकल्प सलागाराच्या नियुक्तीला नुकतीच मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. त्या ठिकाणी केवळ एक प्रकल्प न उभारता विविध ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. प्रकल्पावर देखरेख करण्यासोबतच प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी सरकारकडून आणण्याचे कामही हा सल्लागार करणार आहे.
- डॉ. सचिन बांगर, उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT