‘एल्गार’ प्रकरणातून स्टॅन स्वामींचे नाव वगळण्यास एनआयएचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात आरोपी असलेले दिवंगत सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे नाव या प्रकरणातून वगळण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला आहे. त्यांचे नाव वगळल्यास चुकीचा पायंडा पडेल, असा दावाही एनआयएकडून दाखल प्रत्युत्तरातून केला आहे.
स्वामींचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना झाला. त्यामुळे कायद्यानुसार दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी आवश्यक असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. मिहिर देसाई यांनी न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची स्थिती स्पष्ट करण्यास सांगितले. अतिरिक्त सरकारी वकिलांनी अधिक वेळ मागितल्यानंतर उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली. तत्पूर्वी, एनआयएच्या वतीने न्यायालयात प्रत्युत्तर सादर करण्यात आले.
कायद्याने स्थापित केलेल्या योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आणि बेकायदा सीपीआय (माओवादी) कारवायांशी संबंध असल्याचे पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर स्टॅन स्वामी यांना अटक केली होती, असे एनआयएने याचिकेला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे. तसेच जर न्यायालयाने अशा याचिकांमधील मागणी स्वीकारल्यास ती संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला कमकुवत करू शकते. फौजदारी न्यायव्यवस्थेचा संपूर्ण उद्देश नष्ट करून सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही एनआयएने म्हटले आहे. दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार, स्वामींच्या कोठडीतील मृत्यूची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या चौकशीत काही उणिवा राहिल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे ही याचिका निव्वळ गृहीतकांवर आधारित असल्याचा दावाही तपास यंत्रणेने केला आहे.
...
प्रकरण काय?
एनआयएने ऑक्टोबर २०२०मध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली स्वामी यांना अटक केली होती. तळोजा मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांची प्रकृती बिघडत होती. वारंवार जामीन अर्ज करूनही विशेष एनआयए न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. जुलै २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचे मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या पाच महिन्यांनंतर सेंट झेव्हियर्स कॉलेजचे माजी प्राचार्य फादर फ्रेझर मस्करेन्हास यांनी स्वामींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची आणि त्यांच्याशी जोडलेले दोषी हे नाव काढून टाकण्याची विनंती याचिकेतून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.