ठाण्यातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाण्यातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामध्ये दोन प्रकरणे मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, तर एक प्रकरण श्रीनगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडले आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या प्रकरणात, वागळे इस्टेट परिसरातील १४ वर्षीय विद्यार्थिनी शनिवारी (ता. २७) रात्री ९ वाजता गरबा खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र ती परत आली नाही. तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने ती मामाकडे राहात होती. नातेवाइकांनी आणि मित्रमैत्रिणींनी शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय असून, श्रीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दुसऱ्या घटनेत, मुंब्र्यातील १७ वर्षीय बारावीतील विद्यार्थिनी शनिवारी (ता. २७) ‘सायबर कॅफेमध्ये जाऊन येते’ असे सांगून घरातून निघाली. तीदेखील परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, मुंब्रा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या प्रकरणात, १४ वर्षीय मुलगी शुक्रवारी (ता. २६) रात्री ८ वाजता पाणी भरताना तिचे आई-वडील घराबाहेर गेले असता कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. ती परत न आल्याने तिच्याही अपहरणाची तक्रार मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये आणि ठाणे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. पोलिस तपास सुरू असून, तिन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.