निसर्गासह नाती उजळवणारा उत्सव
ग्रामीण भागातील पारंपरिक दिवाळी साजरी
सुधाकर वाघ ः सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. १९ : मुरबाड तालुक्यासह ग्रामीण परिसरात आजही पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची अनोखी परंपरा जपली जात आहे. निसर्गाशी सुसंवाद साधत गावकऱ्यांनी सण-संस्कृतीचे सोने केले आहे. गुराढोरांची पूजा, रानकाकडीच्या पणत्या, शेणापासून बनवलेले प्रतीकात्मक गुराखी, कडुनिंबाचा काढा, कंदमुळांचा फराळ या आगळ्या वैशिष्ट्यांसह वसुबारसपासून सुरू झालेल्या या दिवाळी उत्सवास ग्रामीण भागात उत्साहाचा माहोल आहे.
ग्रामीण भागात शुक्रवार (ता. १७) पासून वसुबारसच्या दिवशी दारोदारी रानकाकडी किंवा शेंदरीपासून बनवलेल्या ‘चिवरांच्या टिवल्या’ (पारंपरिक पणत्या) लावण्याची प्रथा सुरू झाली आहे. गुरुवार (ता. २३) पर्यंत, म्हणजे भाऊबीजेसह एक आठवडा हा दिवाळी सोहळा सुरू राहणार आहे. रताळे, गोदरे, फरांदे, अलकुंडे, करांदे अशा कंदमुळांचा पारंपरिक फराळ, चिवड्याच्या पणत्या, गुरांची पूजा आणि पारंपरिक खेळ या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण भागात दिवाळीचा जल्लोष ओसंडून वाहत आहे.
बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा शेतकऱ्यांसाठी दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी गुरांना स्वच्छ अंघोळ घालून गेरू व हळदीच्या आरासीसोबत रंगीबेरंगी कापड, कड्या आणि माळांनी सजवले जाते. सूप वाजवून गुरांचे औक्षण केले जाते. नैवेद्य दाखवून त्यांना ‘लास’ (खाद्य) दिली जाते. गावाच्या वेशीपाशी पेटवलेल्या अग्नीवरून गुरांना उडी मारायला लावण्याचा अनोखा पारंपरिक सोहळाही या दिवशी पार पडतो. यालाच परंपरेचा उत्सव मानले जाते.
आरोग्य जपणारी दिवाळी
दिवाळीत गोड पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर शरीरातील संतुलन राखण्यासाठी कडुनिंबाचा कडू रस पिण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही कायम आहे. सणाच्या निमित्ताने शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना फराळासाठी बोलावून स्नेह वृद्धिंगत केला जातो. त्यामुळेच ग्रामीण भागातील ही दिवाळी ‘नाती उजळवणारा उत्सव’ म्हणून ओळखली जाते.
नरकासुराचे चित्र
मुरबाड परिसरातील ही दिवाळी अनेक वैशिष्ट्यांनी सजलेली आहे. अंगणात राखुंडीने नरकासुराचे चित्र रेखाटून त्याचे दहन करण्याची प्रथा काही गावांत आजही कायम आहे. घरोघरी तांदळाच्या पिठापासून ‘बैलराजा’ बनवून त्याची पूजा केली जाते. भुतूकसा, रानखुरासगी, लिखरा, आवळा आदी वनस्पतींच्या फांद्या घराच्या वळचणीला खोचून ठेवण्याचीही परंपरा आहे. या काळात कमळाच्या फुलांचे विशेष महत्त्व असल्याने आदिवासी समाज तलावातून कमळफुले गोळा करून त्यांची पूजा करतो.
पारंपरिकतेचा स्पर्श
दिवाळी सुट्टीचा आनंद लुटणारी बाळगोपाळे मातीचा किल्ला आणि खेळणी बनवण्यात दंग आहेत. शंकरपाळी, करंजी, चकली, बेसनलाडू यांचा गोडवा घरोघरी दरवळत आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री चिबरांच्या टिवल्यांचे दिवे जास्तीत जास्त पेटवून परिसर उजळून टाकण्याची परंपरा आजही जोपासली जाते. रात्री फटाक्यांची आतषबाजीही रंगतदारपणे पार पडते. पारंपरिकतेचा स्पर्श, एकोप्याची भावना आणि शेती-गुरांप्रती असलेली कृतज्ञता यामुळे ग्रामीण भागातील दिवाळी ही खऱ्या अर्थाने निसर्गासह सण साजरा करणारी संस्कारी परंपरा म्हणून आजही उजळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.