कासा, ता. २७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात अखेर मिरची लागवडीला सुरुवात झाली आहे, मात्र अजूनही पावसामुळे या कामात मोठा व्यत्यय येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतांमध्ये अजूनही पाणी साचल्याने मशागत करणे अवघड झाले असून, मिरची लागवडीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. तरीदेखील काही शेतकरी सखल भागात मिरची लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ग्रामीण भागात पारंपरिकपणे भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र यावर्षीच्या अवकाळीने भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकरी आता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मिरची, झेंडू फुले आणि विविध भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत.
पावसाळ्यातील भातशेती बिन भरोशाची मानली जाते, पण उन्हाळ्यात विविध मिरची, झेंडू आणि भाजीपाला लागवड केल्यास अधिक आर्थिक फायदा होतो. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेतले जाते, ज्यात भोपळी मिरचीचे उत्पादन विशेष प्रसिद्ध आहे. लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांची किंमत सुमारे दीड ते दोन रुपये प्रति रोप आहे. गौरी, सुप्रीम, हॉट ईगल अशा विविध जातींच्या मिरच्यांचे उत्पादन घेतले जाते, मात्र या शेतीसाठी मशागत, मजुरी, खत आणि औषध फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, असे रघुनाथ सुतार यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने निर्माण केलेल्या अडथळ्यांनंतरही शेतकरी आशावादी असून, योग्य हवामान मिळाल्यास मिरची उत्पादनातून चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून आम्ही भातशेतीपेक्षा मिरची उत्पादनावर जास्त भर देत आहोत. मिरचीचे उत्पादन चांगले मिळते आणि बाजारभावही समाधानकारक असतो. सध्या मी पाच ते सहा एकर जमिनीवर मिरची लागवड करतो.
- रघुनाथ सुतार,
मिरची उत्पादक शेतकरी, साखरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.