लांब पल्ल्याच्या बस आता विठ्ठलवाडीहून
शहाड उड्डाणपुलाच्या कामामुळे एसटी सेवेत बदल
कल्याण, ता. ५ (बातमीदार) : शहाड उड्डाणपुलाच्या कामामुळे कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारांनी मोठे फेरबदल केले आहेत. यानुसार आता कल्याण पश्चिमेतील बास्केटबॉल कोर्ट परिसरातील एसटी स्थानकातून लांब पल्ल्याच्या कोणत्याही गाड्या सुटणार नाहीत. या सर्व गाड्या थेट विठ्ठलवाडी आगारातून मार्गस्थ होणार आहेत. कल्याण एसटी आगारातून केवळ शहर व परिसरातील लोकल फेऱ्या सुरू राहतील. या बदलामुळे कल्याण पश्चिमेकडील प्रवाशांना आता विठ्ठलवाडी एसटी आगार, डोंबिवली स्थानक किंवा अन्य पर्यायी बस थांब्यांचा वापर करावा लागणार आहे.
पुणे व कोकणाकडे जाणाऱ्या एसटी गाड्या विठ्ठलवाडी आगारातून थेट डोंबिवली स्थानकाकडे धाव घेतील. नाशिक मार्गावरील गाड्या विठ्ठलवाडीहून दुर्गाडीमार्गे, तर माळशेज मार्गावरील गाड्या विठ्ठलवाडीहून सुटल्यानंतर उल्हासनगरमार्गे धावणार आहेत. शहाड पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण आगारातील लांब पल्ल्याच्या गाड्या दुर्गाडी परिसरातून सुरू करण्याची योजना असल्याचे कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी सांगितले. या बदलांमुळे प्रवाशांना सध्या मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर एसटी प्रवासाचे नियोजन करताना नवीन सुटण्याच्या ठिकाणांची नोंद घ्यावी, असे आवाहन विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी प्रवाशांना केले आहे.
एसटीचा वेळ वाचणार
शहाड उड्डाणपुलाच्या बांधकामाबरोबरच कल्याण रेल्वेस्थानक परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे कल्याण पश्चिमेकडील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत होती. काही रस्ते अरुंद व निमुळते असल्याने एसटी गाड्यांना कल्याण शहरात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी तब्बल अर्धा ते एक तास अतिरिक्त वेळ लागत होता. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवासात विलंब होत होता. या निर्णयामुळे एसटीला वाहतूक कोंडी टाळून वेळेवर आपल्या गंतव्यस्थळी पोहोचता येणार आहे.
सोयीस्कर बस थांब्याची मागणी
बससेवेत झालेल्या बदलामुळे कल्याण पश्चिमेकडील प्रवाशांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विठ्ठलवाडीपर्यंत पोहोचणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत असल्याने आता पर्यायी थांबे सुरू करण्याची मागणी होत आहे. पुणे व कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी पत्रीपूल कचोरे परिसरात, तर नाशिक मार्गावरील प्रवाशांसाठी गोविंदवाडी बायपास किंवा दुर्गाडी चौक परिसरात तात्पुरते एसटी थांबे देण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. या ठिकाणी तात्पुरते एसटी थांबे निर्माण केल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गैरसोय टळेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासन आणि एसटी विभागाने या मागणीचा विचार करावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांची तारांबळ
एसटीच्या सेवेत झालेल्या बदलांची माहिती काहींना नसल्याने लांबच्या पल्ल्याचे प्रवासी बस पकडण्यासाठी कल्याण बसस्थानकात येत आहेत. त्यानंतर वाहतूक कोंडीतून बाहेर निघून विठ्ठलवाडी अथवा इतर ठिकाणाहून बस पकडण्यासाठी त्यांची धावपळ होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.