एआयमुळे वाङ्मयचाैर्य ओळखण्याचे आव्हान
‘विश्वकाेश’कडे नोंदी तपासण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा अभाव
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः साहित्य, संस्कृती, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी आदी असंख्य विषयांतील माहिती आणि त्यासाठीच्या ज्ञानसंपदेसाठी प्रमाण मानल्या गेलेल्या राज्य विश्वकोश निर्मिती मंडळापुढे आता कृत्रिम बुद्धिमत्तेने एक मोठे आव्हान निर्माण केले आहे. जगभरामध्ये यांसारख्या यंत्रणेने धुमाकूळ घातला असतानाच विश्वकोश मंडळाकडे विविध प्रकारची माहिती आणि तिची सत्यता तपासून घेण्याची आधुनिक यंत्रणा विकसित झाली नसल्याने येत्या काळात मंडळाकडे कार्यरत होणाऱ्या ज्ञानमंडळाच्या माहितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एआयच्या अमाप वापरामुळे विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर वाङ्मयचौर्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर विश्वकोश मंडळाकडे कोशीय लेखन करणे ही अतिशय गंभीर आणि अभ्यासपूर्ण आणि काटेकोरपणा आणि आशयपूर्ण लेखनाची शिस्त अंगीकारली जाते. यातील प्रत्येक माहिती ही प्रमाणशीर आणि प्रत्येक पुराव्यानिशी नोंदवली जाते. या नोंदीसाठी संबंधित ज्ञानमंडळे आणि तज्ज्ञांना चांगले मानधन दिले जाते. या ज्ञानमंडळांनी येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर काही माहिती सादर केल्यास ती कशी तपासणार, हा मोठा प्रश्न विश्वकोश मंडळापुढे निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते.
--
ज्ञानमंडळाचा लवकरच आदेश
मागील काळात ज्ञानमंडळांनी पुरविलेल्या माहितीवरील गुणवत्तेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाल्याने ती मंडळे बंद करण्याचा निर्णय तत्कालीन विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी घेतला होता. ती आता पुन्हा सुरू केली जाणार असून त्यासंदर्भातील आदेश मराठी भाषा विभाग जारी करणार आहे.
--
अशी होती ज्ञानमंडळे
दिलीप करंबेळकर यांच्या कार्यकाळात पहिल्या टप्प्यातील मराठी विश्वकोशाच्या २० खंडांचे काम पूर्ण झाल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानव्य व विज्ञान विषयाची सुमारे ६० ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली होती.
--
अशा आहेत उणिवा
विविध विषयांतील माहितीच्या नोंदी या सुमारे दाेन हजारांहून अधिक तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळवल्यानंतर ती माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या महाजालातून प्रवास करून आलेली असल्यास कशी तपासायची, त्यातील सत्यता कशी जाणून घ्यायची, याविषयी मराठी भाषा विभागाने तूर्तास कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर ज्ञानमंडळे आणि तज्ज्ञांकडून आलेली माहिती चुकीची आढळल्यास अथवा त्यावर कोणाचे कॉपीराइट असल्यास विश्वकोश मंडळ अडचणीत येण्याची शक्यताही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
--
कोट
‘विश्वकोश’मध्ये विविध विषयातील नोंदी तपासण्यासाठीची यंत्रणा वेगवेगळ्या स्तरावर चालते. त्यासाठी जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्ती आहेत. सध्या मॅन्युअल यंत्रणेद्वारे प्रत्येक नोंद अत्यंत काटेकोर तपासली जाते. सहयोगी संपादक, विद्याव्यासंगी, अध्यक्ष, समीक्षकांचा यात सहभाग असतो. आवश्यकता भासल्यास आधुनिक तंत्रानेही या नोंदी तपासल्या जातात.
- डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ
--
ज्ञानशाखांच्या विस्ताराच्या नव्या नोंदींची माहिती जोडणे हा ज्ञानमंडळाचा मुख्य उद्देश होता. विश्वकोश मंडळाच्या सदस्यांना यासाठी ज्ञानमंडळाचे पालकत्व देऊन त्यांच्याकडून सामूहिकरीत्या नोंदचे काम करून घेतले जात होते. त्यासाठी तेव्हा निधीही मंजूर करून विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना जोडून घेण्यात आले होते.
- दिलीप करंबेळकर, माजी अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.