कोपरीतील वीज तक्रार केंद्र स्थलांतरित
३० वर्षांपासून सुरू असलेले केंद्र ठाणे पश्चिमेला हलवले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे कोपरी विभागातील राज्य विद्युत मंडळाचे वीजदेयक तक्रार निवारण केंद्र गेली तब्बल तीन दशके नागरिकांसाठी सोयीचं ठिकाण ठरले होते, मात्र अलीकडेच हे केंद्र अचानक रहेजा गार्डन, ठाणे (पश्चिम) येथे स्थलांतरित करण्यात आले असून, त्यामुळे कोपरी विभागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याविरोधात ठाणे पूर्व शिवसेनेने लेखी निवेदन देऊन हे केंद्र पुन्हा कोपरी येथे सुरू करण्याची मागणी केली आहे.
वीजदेयक तक्रार निवारण केंद्र सर्वसामान्य ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोठ्या सुविधेचे होते. कोपरी परिसरात राहणारे नागरिक दर महिन्याला वीजबिल, मीटर वाचन, तक्रार निवारण, वीजजोडणी व नामांतरण यांसारख्या कामांसाठी नियमितपणे या केंद्रात येत असतात, मात्र केंद्र हलवल्यामुळे त्यांना ठाणे पश्चिमेतल्या गजबजलेल्या भागात जावं लागतं, यामुळे वाहतूक कोंडी, प्रवासाचा खर्च आणि वेळेचं नियोजन या सर्व समस्या उभ्या राहिल्या आहेत. अनेक वृद्धांना फक्त तक्रार देण्यासाठी किंवा बिलाबाबत विचारण्यासाठी इतकं अंतर पार करावे लागते.
आंदोलनाचा इशारा
दरम्यान, यासंदर्भात ठाणे पूर्व शिवसेनेने निवेदन देऊन हे केंद्र पुन्हा कोपरी येथे सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाने हे केंद्र पुन्हा कोपरीत सुरू केलं नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. स्थानिक पातळीवर या विषयावर चांगलीच चर्चा रंगली असून, शिवसेनेच्या पुढाकारामुळे पुन्हा तक्रार निवारण केंद्र कोपरीत येईल, असा विश्वास स्थानिकांना आहे.
गैरसोय होणार नाही
यासंदर्भात महावितरण केंद्राशी संपर्क साधला असता, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र ठाणे पश्चिम येथे स्थलांतरित झाले असले तरी, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन, तक्रार निवारणासाठी कर्मचारी ठेवले जाणार आहेत.