आधी दुरुस्ती करावी, मगच ताबा
आयुक्तांची स्पष्ट भूमिका ः घोडबंदर मार्ग आता महापालिकांकडे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी, दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडणारे खड्डे यांमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. अशातच या रस्त्यांवरील खड्डे हे संबंधित प्राधिकरणाऐवजी ठाणे व मिरा-भाईंदर पालिकेला भरावे लागत आहेत. त्यामुळे हे रस्ते ठाणे व मिरा-भाईंदर पालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी, दुसरीकडे रस्ते हस्तांतरित करण्यापूर्वी सध्या रस्त्याचा ताबा ज्या प्राधिकरणाकडे आहे, त्यांनी ते रस्ते सुस्थित करून द्यावेत मगच महापालिका त्यांचा ताबा घेईल, अशी अटच आयुक्त सौरभ राव यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या बैठकीत बोलताना टाकली.
ठाणे पालिका क्षेत्रातून घोडबंदर रोड मार्गे वसई, विरार, गुजरातकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असून, या रस्त्यावरून हलक्या वाहनांसह अवजड वाहनांचा भार अधिक आहे. त्यात पावसाळ्यात या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अथवा अवजड वाहने बंद होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून, या कोंडीवर उपाय शोधण्याची मागणी सातत्याने होत आहे. मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के या दोन्ही नेत्यांनी आठवड्याभरात स्वतंत्र बैठका घेऊन घोडबंदरची कोंडी सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. या मार्गावर अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहतुकीकरिता पिवळ्या मार्गिकेचा विचार ठाणे वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.
दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव
याच पार्श्वभूमीवर हा रस्ता दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रस्तावानुसार गायमुख ते फाउंटनपर्यंतचा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे, तर कापूरवाडी ते गायमुख हा रस्ता ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच आता, घोडबंडर रोड आणि इतर रस्त्याचा स्वीकार करण्यास महापालिका तयार आहे. हस्तांतरणापूर्वी, सध्या या रस्त्याचा ताबा ज्या यंत्रणांकडे आहे, त्यांनी ते रस्ते सुस्थित आणून ठेवावेत. मगच महापालिका त्यांचा ताबा घेईल, अशी अटच सौरभ राव यांनी ठेवली आहे.
दुरुस्तीचा प्रश्न
घोडबंदर मार्ग ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतून जातो. हा रस्ता बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि इतर विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे कोणत्या प्राधिकरणाची नेमकी जबाबदारी आहे, हे स्पष्ट नसल्याने दुरुस्तीचा प्रश्न नेहमी उभा ठाकत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.