साहित्य जगले तरच भाषा जगेल
कवी प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : मराठी भाषा मरत चालली असून साहित्य जगले तर भाषा जगेल. भाषांचे अलंकार, शैली पुढच्या पिढीला कधीच कळणार नाही, असे कवी प्रसाद कुलकर्णी यांनी म्हंटले आहे. ग्रंथाली प्रकाशनतर्फे मोहन काळे लिखित ‘चला, पुन्हा शाळते जाऊ या!!’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा ठाणे मराठी ग्रंथालय येथे शुक्रवारी (ता. १४) उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या प्रकाशन सोहळ्यास कवी व गीतकार अरुण म्हात्रे, कवी प्रसाद कुलकर्णी, कवी संदेश ढगे, कवी प्रशांत पाटील, ग्रंथालीचे संस्थापक अरुण जोशी यांसह अनेक मान्यवर व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण शिंदे, श्रीहर्ष फेणे, मोहन मोरे आणि भाजप पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शारदभाऊ बुट्टे पाटील यांनी मोहन काळे यांच्या आधीच्या पुस्तकाच्या १०० प्रती विकत घेतल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रमही यावेळी पार पडला. या पुस्तकाचे चित्रकार पुंडलिक वझे, सुदेश हिंगलासपूरकर, संपादक अरुण जोशी, डॉ. लतिका भानुशाली, धनश्री धारप व निवेदिका अश्विनी भोईर यांचाही शाल देऊन सन्मानित करण्यात आला.
बालदिनानिमित्ताने चला, पुन्हा शाळते जाऊ या!! या पुस्तक प्रकाशनसाठी मोठे कवी मंडळींनी उपस्थिती दर्शवत मला आशीर्वाद दिला. मी चाचपडत लिहू लागलो तेव्हा अरुण म्हात्रे यांचे बोट धरले, तेव्हा कविता कळली म्हणजे कोणत्या कलेमध्ये गुरूशिवाय गती नसते हे कळले, असे कवी मोहन काळे म्हणाले. आजचे बालक उद्याचे वाचक असून यामुळे मुलांनी पुस्तकातील काय कळले हे सांगितले की ३०० रुपये रोख बक्षीस देऊन प्रोसाहित करत आहे. दरम्यान, पुंडलिक यांना हे पुस्तक अर्पण केले असल्याचे मोहन काळे यांनी सांगितले.
दरम्यान, ग्रंथालीतर्फे विविध उपक्रम सातत्याने राबवले जात असून त्याचाच एक भाग म्हणून २१ व २२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे कार्यक्रम होणार आहे. तर, २८ व २९ नोव्हेंबरला वाचक दिन विविध उपक्रमांसह मराठी ग्रंथ संग्रहालय येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सुदेश हिंगलासपूरकर यांनी दिली.
..तरच अभिजात मराठी भाषा होईल
तर, मुलांना साहित्यमध्ये रुजवून ठेवलं तर भविष्य चांगलं होईल. आई-वडिल सतर्क झाले आणि मराठी शिकवतील, मुलांशी मराठी बोलू लागले तर मूल शिकतील. सगळ्या स्तरावर मराठी पोहचले पाहिजे. अभिजात मराठी म्हणजे आपण सर्व शुद्ध मराठी बोलले पाहिजे तरच अभिजात मराठी भाषा होईल, असे मत अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.