पालघर, ता. १७ (बातमीदार) : समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या विकासाचे मॉडेल तयार करावे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे आणि राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त करून जिल्ह्याचे नाव गौरवाने उजळवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाडा पंचायत समिती येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर, गटविकास अधिकारी वैभव शिंदे, तसेच वाडा तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान तालुका स्तरावरील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, कामांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी हीच खरी प्रगतीची ओळख आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून या अभियानात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना सहभागी करून घेऊन तालुका आणि जिल्हास्तरावर पुरस्कारप्राप्तीचे लक्ष्य साध्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांना केले.
शाळांना भेट
आढावा सभेनंतर मनोज रानडे यांनी वाडा तालुक्यातील भुजडपाडा शाळा आणि अंगणवाडी केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. तसेच पंतप्रधान जनमन घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.