महेश भोये : सकाळ वृत्तसेवा
तलासरी, ता. २३ ः तलासरीमधील शहरी भाग वगळता ग्रामीण आणि दुर्गम भागातील गाव-पाड्यांमध्ये आर्थिक दारिद्र्याची भीषण स्थिती आजही कायम आहे. स्थानिक स्तरावर रोजगार नसल्याने खेड्यांमधील कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिक कुडाच्या झोपडीत राहत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ १५ ते २० हजारांपर्यंतच आहे. आमच्या भागात रोजगार नाही. अर्धवट शिक्षण, रोज मिळेल असे कामही हाताला नाही, अशी व्यथा अनेक कुटुंबांनी व्यक्त केली असून ही कुटुंबे गरिबीच्या छायेत आहेत. तलासरी तालुक्याच्या दुर्गम पाड्यांतील ही अवस्था पालघर जिल्ह्यातील विकासगतीला मोठा विरोधाभास ठरते.
शिक्षणामुळे रोजंदारीची मर्यादा
आर्थिक परिस्थिती नसल्याने तरुण वर्ग शिक्षण सोडून नोकरी, मजुरीकडे वळत आहे. मनरेगासारख्या योजनेची मजुरी उशिरा मिळणे, मजुरीचे कमी दर आणि अपुरे दिवस या कारणांमुळे लोक बहुतांश खासगी कामांकडे वळतात. अर्धवट शिक्षणामुळे त्यांना कुशल कामगार म्हणून संधी मिळत नाही. तरुण दिवस-मजुरीवर खासगी कंपन्यांत अल्पदरात रोजंदारीवर काम करतात, तर महिला आणि काही वयोवृद्ध महिला मोलमजुरी करून तुटपुंज्या मजुरीवर घर चालवतात.
चाकरीची नामुष्की
काही कुटुंबे आर्थिक गरजेतून वीटभट्टी उद्योगात आगाऊ पैसे घेऊन चाकरी करतात, तर काहींचे स्थलांतर इतर शहरांत होते. अनेक तरुण तीन ते चार महिन्यांसाठी समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवर जातात. काही वेळा भारताच्या समुद्र सीमारेषा ओलांडताना ते पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या ताब्यात जातात आणि महिनोन्महिने कारागृहात अडकून राहतात. काही तरुण साधारणतः १८ ते २० वयोगटातील हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसलेल्या हॉटेल, धाब्यांवर काम करून उदरनिर्वाह चालवत आहेत.
स्थानिक रोजगाराचा अभाव
सरकारने उपलब्ध संसाधनांवर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली असली तरी प्रत्यक्ष स्तरावर कोणतीच ठोस हालचाल दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे गाव-खेडे परिसरातून ७० ते ८० टक्के तरुण बाहेर शहरात जाऊन दिवसाच्या कमी वेतनावर उपजीविका करीत आहेत.
जीवनमानावर परिणाम
स्थलांतराचा फटका लहान मुलांच्या पोषणावर, गर्भवतींचे आरोग्य आणि शिक्षणावर मोठ्या प्रमाणात बसतो. ज्या ठिकाणी ते राहतात, तिथे राहणीमान अत्यंत निकृष्ट असल्याने कुटुंबांचे एकूण जीवनमान ढासळत आहे. त्यामुळे तालुक्यात बालकांचा कुपोषणाचा दर, तसेच गर्भवतींचे मृत्यूदेखील वाढत आहेत. अनेक मुलांमध्ये अपंगत्वाचे प्रमाण पाहायला मिळत आहे.
विकास प्रकल्पांचे दावे
एकीकडे पालघर जिल्हा औद्योगिक, बंदर विकास आणि विविध प्रकल्पांमुळे आर्थिकदृष्ट्या प्रगत होत असल्याचे सरकार सांगत असताना, दुसरीकडे तालुक्यात आजही रोजगाराचा गंभीर प्रश्न कायम आहे. प्रकल्पांची वारेमाप चर्चा होत असली तरी ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमानात काहीच बदल झाला नाही, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आमच्याकडे रोजगार नाही, जमीन नाही, तुकडा जमिनीत अल्प उत्पन्न मिळते. कुटुंबांची आर्थिक स्थिती तर सोडा, दोन वेळचे जेवण मिळणे मुश्कील आहे. मुलगा जन्मताच दिव्यांग असल्याने जगण्यासाठी अतिसंघर्ष करावा लागतो, असे सूत्रकार येथील नरेश डावरे यांनी सांगितले.
तालुक्याचा शहरी ठरावीक भाग वगळता, गाव-खेड्यांतील कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. एकीकडे पालघर जिल्हा विकासाच्या झोतात जातो, तर ग्रामीण भाग अंधारात गुंतून राहिला आहे. कधी ही स्थिती बदलेल का?
- गीता पारधी, सामाजिक कार्यकर्त्या
विकासापासून ही खेडी मैलभर दूर
सूत्रकार, वडवली, मंडळ पाडा, कोचाई, बोरमाळ, नारायण ठाणे, झरी कवाडा, सावरोली, उधवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.