शाळांमध्ये होणार कीर्तनाचा गजर
मूल्यशिक्षणासोबत संतांच्या शिकवणीचे धडे; नवकीर्तनकारांची फौज प्रबोधनासाठी सज्ज
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यातील शाळांमध्ये तब्बल ६०० हून अधिक तरुण कीर्तनकार भागवत संप्रदायाने दिलेल्या मूल्यशिक्षणाचे धडे देणार आहेत. यासाठी आळंदी येथील वारकरी संप्रदाय युवा मंचचे कीर्तनकार शाळांचे आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते शाळांसोबत राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत गाडगे महाराज यांनी दिलेला लोकशिक्षणाचा वारसाही सांगणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता. २३) दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून आळंदी येथे वारकरी संप्रदाय युवा मंचच्या एका कार्यक्रमात मंचाने राज्यातील शाळांमध्ये आपले ६०० हून अधिक कीर्तनकार लोकप्रबोधन करणार असल्याचे आश्वासन दिले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये हे कीर्तनकार मुलांना संतांच्या शिकवणीतील लोकहित, त्यांनी दिलेला प्रबोधनाचा, शिक्षणाचा, पर्यावरण, मूल्यशिक्षण आदींचा वारसा सांगणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी हे कीर्तनकार एकही रुपयाचे मानधन घेणार नाहीत. या वेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही वारकरी संप्रदायांतील संतांनी निर्माण केलेल्या साहित्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. यासोबतच राज्यातील शिक्षणव्यवस्था, त्यासाठी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, त्याचे लाभ, शासकीय, अनुदानित आदी माहिती देणार असल्याने येत्या काळात राज्यात शिक्षणासाठी कीर्तनकारांच्या मार्फत एक मोठी लोकचळवळ उभी राहील, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.
--
अभ्यासक्रमात नव्याने समावेश
शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही संत वाङ्मयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी नव्याने काही विषयांचा समावेश केला जाणार आहे. यात संत चरित्र अभ्यास,
वारकरी संप्रदायातील नैतिक मूल्यांवर आधारित मॉड्यूल, शाळांमध्ये दिंडी पथक, अभंग गायन स्पर्धा, संत वाङ्मय वाचन उपक्रम, परिसंवाद, संस्कृतीची ओळख तसेच पर्यावरण, निसर्ग आदींचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबण्यासाठी त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल, तसेच यासाठी कीर्तनकार मोठी भूमिका बजावतील, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. समाजकारण व राष्ट्रनिर्मितीत वारकरी युवकांची भूमिका, संत मूल्यांवर आधारित भारत निर्माण हा दीर्घकालीन दृष्टिकोन यात ठेवण्यात आला आहे.
राज्यातील शाळांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. यात संतांचे अभंग, रचना यांचा समावेश असेल. तसेच कीर्तनाच्या प्रबोधनातून मूल्यशिक्षण, पर्यावरण, कौशल्यविकास, युवा नेतृत्व आदींचे महत्त्व कीर्तनातून दिले जाणार असून, आमचे ६०० कीर्तनकार हे प्रबोधनाचे महापर्व सुरू करण्यासाठी तयार आहेत.
- अक्षय महाराज भोसले, अध्यक्ष, वारकरी युवा मंच, आळंदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.